Rajesh Tope-Imtiaz Jalil
Rajesh Tope-Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope : आम्ही शाळेपासूनचे मित्र; सांत्वनपर भेटीतील ही अनौपचारिक चर्चा ..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. (Mp Imtiaz Jalil) इम्तियाज यांच्या आईचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. एक राजकारणी आणि शाळेपासूनचे मित्र म्हणून (Rajesh tope) टोपेंचा त्यांचा कौटुंबिक स्नेह आहे. सांत्वनपर भेटीत काही राजकीय विषयांवर अनौपचारिक चर्चा झाल्या, त्यातून इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाचे खंडण करतांना आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, असा प्रस्ताव मांडला. (Aurangabad) तेव्हा मी तुमची इच्छा आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत कळवतो, एवढेच मी त्यांना म्हणालो, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

टोपे यांनी इम्तियाज जलील यांची घेतलेली सांत्वनपर भेट आणि त्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीतील पक्षांसह विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांच्याकूडन देखील यावर प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. नेमकं इम्तियाज जलील यांच्या भेटीत काय घडलं हे राजेश टोपे यांनी प्रसार माध्ममांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

राजेश टोपे म्हणाले, इम्तियाज जलील आणि मी अगदी पहिली ते दहावीपर्यंत एकत्र शिकलो आहे. बालपणीचे आम्ही मित्र आहोत, नंतर ते राजकारणात आले, आमदार आणि आता खासदार, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले. त्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी ही भेट घेतली. कौटुंबिक विषय झाल्यानंतर सहाजिकच राज्य आणि देशातील राजकारणावर अनौपचारिक चर्चा झाली.

यात तुमच्यामुळे भाजपला फायदा होतो, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तुमच्यामुळे भाजपच्या जागा निवडून आल्या हा विषय निघाला. एमआयएमच्या उमेदवारामुळे भाजप विरोधी आघाडीचे १० ते १५ उमेदवार हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. यावर इम्तियाज यांची भूमिका अशी होती की, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचा विकास करणे, त्यांची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आमच्या पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे आम्ही देशभरात जिथे जिथे पक्षाची ताकद आहे तिथे निवडूणक लढवतो. आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण मग आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. यावर आपण राज्यातील महाविका आघाडी सरकार कसे अल्पसंख्याक विभागाच्या कल्याणासाठी काम करत आहे, योजना राबवत आहे, हे सांगितले. तेव्हा इम्तियाज यांनी आम्ही महाविकाकस आघाडीत यायला तयार आहोत, असा प्रस्ताव दिला. तेव्हा यावर महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील असे मी त्यांना स्पष्ट केले.

शिवाय विकासाच्या मुद्यांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करा, असेही मी त्यांना सुचवल्याचे टोपे म्हणाले. परंतु ही चर्चा अगदी सहजपणे झाली, एमआयएमने कट्टरतावादी भूमिका सोडून सर्वसमावेशक अशी भूमिका घ्यावी, असा सल्ला देखील आपण त्यांना दिल्याचेही टोपे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र सांत्वनासाठी गेलेले राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्याशी राजकीय चर्चा करणार नाही, राष्ट्रवादीची ती संस्कृती नाही, असे म्हणत अशी काही चर्चा झालीच नसेल असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT