Raju Shetti  Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetti News : राजू शेट्टीचा सरकारला इशारा, 'शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा'

Raju Shetti Farmer Loan Waiver : ज्या वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती घडवून आणली. महाराष्ट्राला कृषीप्रधान केले त्यांच्या जन्मगावातूनच आम्ही राज्यात 'वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलन' करणार आहोत, असे राजू शेट्टी म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

सुशांत सांगवे

Raju Shetti News : राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव याला सरकारची धोरणं जबाबदार आहेत. आयात, निर्यात धोरणाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.

त्याचा उत्पादन खर्चच निघत नाही. त्यामुळे काढलेले पीक कर्ज त्याला फेडता येत नाहीये. या कर्जाच्या जोखडातून शेतकऱ्याला काढा नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना उद्या (ता.1) पासून हरितक्रांतीचे जनक दिवगंत वसंतराव नाईक यांच्या गावातून राज्यभर कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे मुश्किल झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी Loan Waiver देणे आवश्यक आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही उद्यापासून (ता.1) राज्यात 'वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलन' करणार आहोत. ज्या वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती घडवून आणली, महाराष्ट्राला कृषीप्रधान केले त्यांच्या जन्मगावातूनच आम्ही हे आंदोलन सुरू करणार आहोत.

कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर लढा

सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त केले नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, याचा पुनरुच्चारही शेट्टी यांनी केला. सध्या राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे पावसाळी विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून विविध योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत सरकारची कोंडी केली आहे.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने न होणारी कर्जाची परतफेड या सगळ्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले आहेत. तर इकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.

838 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. पण यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलेच भाष्य केले नाही, की आश्वासन दिले नाही.

यावर विरोधकांनी सरकारवर टीका करत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मांडली होती. राज्यात 2024 या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक 235 शेतकरी आत्महत्यांची नोंद एकट्या जानेवारी महिन्यातच झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात 208 तर, मार्च महिन्यात 215, एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. याचा हिशोब लावल्यास दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी दिलेल्या आंदोलनाकडे सरकार किती गांभीर्याने पाहते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT