Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

आघाडी सरकारची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी ; दानवेंची खरमरीत टीका

सरकारनामा ब्युरो

जालना : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ''महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi)सरकारमधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी आहे,'' अशी टीका दानवे यांनी केली आहे.

जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या वतीने 'केंद्रीय अर्थसंकल्प-महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार' या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ते बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, ''राज्यात भाजपचं सरकार आणखी 5 वर्ष हवं होतं. मात्र राज्यात भाजपचं सरकार नाही याची खंत सर्वांना आहे. तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरू असल्याचे सांगत दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली आहे.

''तिरुपती बालाजी येथील न्हावी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाच्या डोक्यावरील केस एकदाच न काढता सुरुवातीला दोन दोन वस्तारे हाणून त्यांना बसून ठेवतात. तर त्यांच्या डोक्यावर राहिलेले अर्धे केस दिवस वळाल्यानंतर काढतात. आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी ते असं करत असतात,'' असे दानवे म्हणाले.

''लोक पक्षांपासून तुटू नये म्हणून हे तिन्हीही पक्ष दोन दोन वस्तारे हाणून विकासकामांना तुटपुंजा निधी देत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे. पण 2024 नंतर काही करता आलं तर बघू ,'' असे दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT