Raosaheb Danve-Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aaditya Thackeray News : रावसाहेब दानवे पहिल्यांदा खरं बोलले..

Jagdish Pansare

Shivsena-BJP Political News: अजित पवार सोबत आल्यामुळे नव्हे तर उद्धव ठाकरे दूर गेल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही, हे रावसाहेब दानवे यांनी मान्य केले म्हणजे, भाजप पहिल्यांदाच खरे बोलली, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते संभाजीनगरात आले होते. यावेळी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी संयोजक पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी `सकाळ` च्या थेट भेट कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला फटका बसला का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्याला उत्तर देतांना अजित पवार यांना सोबत घेतल्याने फटका बसला नाही, पण उद्धव ठाकरे गेल्याचा फटका बसला, असे उत्तर दिले होते. या विधानाचे राजकीय पडसाद उमटत असताना आदित्य ठाकरे यांनी त्यावर भाष्य करत भाजपला टोला लगावला.

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे उद्दिष्ट भाजपला हद्दपार करणे हेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा प्रश्‍न नंतरचा आहे. एका-एका जागेवरून ओढाताण होणारच आहे आणि प्रत्येकाने जागा मागणे ही ताकद आहे.

तसे झालेही पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार `लाडकी बहीण` योजनेचे श्रेय घेत असतील तर हाफ डीसीएम, घटनाबाह्य मुख्यमंत्री यांची काय प्रतिक्रिया येईल, याची वाट पाहावी लागेल.

कॅबिनेटमधील अनेक प्रकार आपल्यासमोर येतच असतात, असा टोला ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लगावला. सांगली येथे गुरुवारी (ता. पाच) होणारा कार्यक्रम कॉंग्रेस पक्षाचा आहे.

महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत मराठवाड्याचा दौरा करत आहे.

सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. पाहणीनंतर नुकसानभरपाईची राज्य शासनाकडे मागणी केली जाईल. महसूल यंत्रणा आपले पंचनामे करत राहील, पण यापूर्वी मराठवाड्यात गारपीट झाली होती.

गेल्यावेळी महसूल यंत्रणनेने चुकीचे पंचनामे केले. कुठे पाच रुपये, कुठे पन्नास रुपये असे मदतीचे धनादेश मिळाले. यावेळी तसा प्रकार होऊ नये, त्याला आमचा विरोध राहील, असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT