Mahaprbodhan Rally In Beed News
Mahaprbodhan Rally In Beed News Sarkarnama
मराठवाडा

Mahaprabodhan Rally Beed News : राऊत, अंधारेंनी सभा गाजवली ; पण ठाकरे गटाला ताकद मिळणार का ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरात काढण्यात आलेल्या महाप्रबोधन रॅलीचा समारोप काल बीडमध्ये झाला. तत्पुर्वी ठाकरे गटाचे नुकतीच हकालपट्टी झालेले जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात झालेला वाद या पार्श्वभूमीवर महाप्रबोधन यात्रेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीने देखील या यात्रेची आणि भगवानगड, परळी असा दौरा करत त्यांनी बीडमध्ये केलेल्या भाषणाची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

सुषमा अंधारे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या शैलीला साजेशी अशी भाषणं केली. भाजप, शिंदे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत या दोन्ही वक्त्यांनी टाळ्या मिळवल्या. (Shivsena) पण या सभेने जिल्ह्यातील ठाकरे गटात पडलेली फूट आणि क्षीण झालेली ताकद पुन्हा मिळणार का? हा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात विशेषत: शहरात कधीकाळी शिवसेनेची ताकद होती. प्रा. सुरेश नवले, सुनील धांडे हे बीड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.

नवले हे दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले, राज्यमंत्रीही झाले. पण जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेला प्रमुख पक्ष मात्र कधीच होता आले नाही. (Beed) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील बोटावर मोजण्या इतकेच प्रतिनिधित्व या पक्षाला मिळाले. राज्यात २५ वर्षापेक्षाअधिक काळ शिवसेना-भाजपची युती होती. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा या युतीमध्ये आणि ती टिकवण्यात सिंहाचा वाटा होता.

त्यामुळे बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या नेतृत्वाने फारसे कधी लक्ष घातले नाही. मुंडे यांना सोयीचे ठरेल असेच निर्णय त्या काळात घेण्यात आले. परिणामी शिवसेना बीड शहरापुरतीच मर्यादित राहिली. शिवसेनेत पडलेली फूट, भाजपने दिलेला दगा आणि राज्यातील सत्तांतरानंतर आता पुन्हा ठाकरे गटाने आपला मोर्चा बीडकडे वळवला आहे. पण ज्या जुन्या नेत्यांनी मंमत्रीपद, आमदारकी मिळवली होती, ते प्रा. सुरेश नवले आता ठाकरेंना सोडून शिंदे गटासोबत गेले आहेत.

तर माजी आमदार प्रा. सुनील धांडे हे ठाकरेंसोबत आहेत. शिवसेनेत फूट पडण्याआधी आणि नंतर देखील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणाने पक्ष वाढीला जिल्ह्यात फारसा वाव मिळाला नाही. आता तर शिवसेना दोन ठिकाणी विभागली गेली आहे, त्यामुळे सभेला गर्दी जमवणे आणि सभा गाजवणे या गोष्टी एकीकडे आणि संघटनेची नव्याने बांधणी करून प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणे हे यातून साध्य होणार का? हा खरा प्रश्न आहे.

मराठवाड्यातील संघटनात्मक जबाबदारीमध्ये ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे बीड जिल्ह्याची जबाबदारी होती. पंरतु आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार अशी अवसस्था असल्याने बैठका, मेळावे घेत त्यांनी सोपस्कार पार पाडले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी देखील आघाडीची सत्ता आणि मंत्रीपद जाताच भूमिका बदलली.

त्यामुळे आता नव्याने बीडमध्ये नेतृत्व निर्माण करणे आणि संघटना वाढीला लावण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांसमोर असणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी असली तरी इथे राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे ठाकरे गटाला छोट्या भावाच्या भूमिकेतच राहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT