Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर दोन दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. हजारो कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या महामार्गावर सुरुवातीला अपघात वाढले होते. आता ते कमी झाले तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना चक्क लुटण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
दोन दिवसांपुर्वी एका कुटुंबाला अडवून लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न विरोधक उपस्थितीत करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून समृद्धी महामार्ग दरोडेखोरांना आंदण दिला आहे का? असा सवाल करत टीका केली होती.
दानवेंनी सोमवारी समृद्धी महामार्ग, त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून प्रति किलोमीटर आकारला जाणार टोल आणि त्या बदल्यात प्रवशांना काय मिळते? अशी विचारणा करणारे बारा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. 'समृद्धी एक्स्प्रेसवे'वर एका चारचाकीला दर किलोमीटरसाठी द्यावा लागणारा २.०७ रूपये टोल आणि त्या मोबदल्यात १८ लाखांचा दरोडा, असा टोला लगावत त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे आहेत अंबादास दानवे यांचे प्रश्न
१. १८ लाखांचा दरोडा
२. दरोड्यानंतर फोडलेले टायर बदलून देण्याचे चोरांचे सौजन्य
३. प्रचंड भीती
४. पोलिसांची शून्य गस्त
५. जनावरांचा मुक्त संचार
६. वाहनांमधील बॅटऱ्या आणि डिझेलची चोरी
७. चोरट्यांना झाडांचा आडोसा
८. काठ्या, लाथा, बुक्क्यांचा मार
९. बंद सीसीटीव्ही कॅमेरे
१०. फोनला प्रतिसाद न देणारी बोगस यंत्रणा
११. गॅस गळती
१२. गाड्यांवर दगडफेक
या प्रश्नांची यादी देत धन्यवाद सो-कॉल्ड (तथाकथित) इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, एमएसआरडी असा खोचक टोला लगावला आहे. आम्हाला विश्वास आहे आपण या विषयी साधी बैठक लावून यंत्रणेकडे डोळे वटारूनही बघणार नाहीत, खडसावणे, जाब विचारणे लांबच, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून केली आहे.
तत्पुर्वी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अर्थात समृद्धी महामार्ग जणू दरोडेखोरांना आंदण दिल्यासारखा झाला आहे. दीड तास वाहन लुटले जाते, प्रवाशांना मारहाण केली जाते आणि वरून चोरटे स्टेपनी लावून देण्याची भाषा करतात. इतका सर्रास दरोडा पडत असताना गस्तीवरील पोलीस सुट्टीवर होते का?, अशी टीका दानवेंनी केली होती.
अशा पद्धतीने लुटीचे प्रकार सुरू असतील, तर समृद्धी महामार्गावरून लोकांनी प्रवास का म्हणून करावा? समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र पोलीस बळाची आवश्यकता असताना, स्थानिक पोलीस ठाण्यांच्या जीवावर हा महामार्ग सोडून दिला जात आहे, असेही दानवे म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.