Ncp Laeader Sharad Pawar
Ncp Laeader Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : जे गेले ते गेले, तुमची साथ असेपर्यंत काम करतच राहणार

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : आज मी एवढ्या छोट्या कार्यक्रमासाठी का आलो याची चर्चा सुरू आहे. पण या जिल्ह्याने आम्हाला नेहमीच साथ दिली, मध्यंतरी काही लोक सोडून गेले, जे गेले ते गेले, त्याची चिंता करायचे कारण नाही. (Osmanabad) जोपर्यंत तुमची मला साथ आहे, तोपर्यंत या राज्याच्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी काम करतच राहणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थितांना दिला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या तथा युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सर्कलमधील विविध विकास कामांच्या उद्धाटन आणि लोकार्पणासाठी शरद पवार आज जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा आणि राज्यातील जनतेने आपल्याला काही कमी केले नाही, असे सांगत उर्वरित आयुष्य आता तुमच्या सेवेतच घालवणार असल्याचे सांगितले.

बऱ्याच वर्षांनी शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले होते. शरद पवार यांनी आपल्या भाषणात राज्यासह देश आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दलची चिंता देखील व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो, जिल्हा, तालुका असो की गावपातळीवरचे काम माझ्यासाठी महत्वाचे असते. ज्या तरुणांमध्ये समाजाच्या हितासाठी, भविष्यासाठी काही करण्याची धमक असते त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला आलो.

उस्मानाबाद जिल्ह्याने नेहमीच मला साथ दिली, राज्यातील जनतेने देखील भरभरून दिले. या राज्याचा एकदा नाही तर चारवेळा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य तुमच्या, राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे हा निर्धार केला आहे.

मगाशी कुणी तरी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला, मी ८२ वर्षांचा झालो, म्हातारा झालो, पण यांना काय माहित मी काय काय करू शकतो. मी अजून थकलेलो नाही, त्यामुळे तुमची साथ असेपर्यंत मी हे राज्य समृध्द करण्यासाठी काम करत राहीन. जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्ना संदर्भात मी आताच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी देखील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निविदा काढल्याचे सांगून येत्या दोन-तीन महिन्यात काम सुरू होईल असे सांगितले आहे.

राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच आम्ही महाविकास आघाडी केली, तीन पक्ष एकत्र आलो आणि अत्यंत मजबुतीने काम करतो आहोत. केवळ सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो नाही, तर हे राज्य अधिकाधिक समृद्ध कसे होईल, येथील जनतेचे भविष्य कसे सुरक्षित होईल या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत, असेही पवारांनी स्पष्ट केले. सक्षणा सलगर यांच्या कामाचे कौतुक करतांना राज्यातील युवतीचे नेतृत्व आम्ही सक्षणा हिच्या खांद्यावर टाकले आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे ती ओळखून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि म्हणून मी इथे आलो, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT