Jaydatta Kshirsagar, Sandip Kshirsagar
Jaydatta Kshirsagar, Sandip Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

‘ऐरे गैरे नत्थु खैरे’ म्हणत काकांनी पुतण्याचे शिलेदारही लावले गळाला

Dattatrya Deshmukh

बीड : शिवसेना (Shiv Sena) शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) पुन्हा एकदा बीडच्या (Beed) राजकीय मैदानात आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी ‘किती आले गेले, अनेक पाहिले’, ‘ऐरे गैरे नत्थु खैरे’ नुसतं नारळं फोडण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा नाव न घेता पुतणे संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यावर निशाणा साधला. शिवाय आता संदीप क्षीरसागरांचे नाराज समर्थकही गळाला लावले असून सोमवारी या समर्थकांचा पक्षप्रवेशही निश्चित मानला जात आहे.

मागील नगरपालिका निवडणुकीपासून (Election) आमदार संदीप क्षीरसागर यांची राजकीय वाटचाल चढतीच राहिली आहे. मात्र, आता साडेपाच वर्षांनी त्यांना धक्का देण्यासाठी जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी कंबर कसली आहे. साडेपाच वर्षांपूर्वी संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले. अनेक ताकदवान समर्थकांनी काकांचा हात सोडून पुतण्याची साथ दिली. सुरुवातीला काकू - नाना आघाडीच्या माध्यमातून नगर पालिका व नंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लढविल्या. या दोन्ही निवडणुकांत संदीप क्षीरसागर यांची कामगिरी काकांपेक्षा काकणभर सरस राहिली.

विधानसभेला तर त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा धक्कादायक पराभव केला. एकूणच त्यांची राजकीय कमान चढती राहिली. नंतरच्या काळात जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेने म्हणावे तेवढे पाठबळ दिल्याचे चित्र नाही. मात्र, सत्ता, विकास निधी असतानाही संदीप क्षीरसागर यांचे एकेक समर्थक नगरसेवकांनी पक्षांतर केले. मागच्या दोन - तीन महिन्यांत विकास कामांच्या उद॒घाटनांच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा राजकीय वातावरण तयार केले.

दरम्यान, आगामी नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या तयारीसाठी त्यांनी नाराज असलेल्या व संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेल्या मंडळींना जयदत्त क्षीरसागर गळाला लावले आहे. यात प्रामुख्याने गटनेते फारुक पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे, बाबूराव लोढा, अमर नाईकवाडे व शिवसंग्रामच्या नितीन लोढा यांचाही समावेश आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

आता पुन्हा शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय आखाड्यात जोरदार उडी घेतली आहे. बीडच्या मेळाव्यात त्यांनी नाव न घेता संदीप क्षीरसागर यांच्यावर जोदार टीकास्त्र तर सोडलेच. तसेच 'मंजील उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है, पंखो से कुछ नही होता यारो हौसलो से उडान होती है, अशी शेरोशायरी करत त्यांनी भविष्यातील ध्येय देखील सांगून टाकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT