Nilangekar Sugar Factory
Nilangekar Sugar Factory Sarkarnama
मराठवाडा

Sugar factory : शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याकडून लातूर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक उचल!

राम काळगे

Latur News : शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्याला व प्रगतीला प्राधान्य या उद्देशाने सुरू करण्यात आलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, ओंकार शुगर्सने लीजवर चालवण्यास घेतलेला आहे. या कारखान्याकडून आता चालू गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या व येणार्‍या उसाला कारखान्याकडून प्रतिटन 2700 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे.

लातूर जिल्ह्यात ही सर्वाधिक उचल आहे. ज्या शेतकर्‍यांनी ऊसगाळपास दिलेला आहे, त्या शेतकर्‍यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली आहे.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आलेला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद पडलेला होता. अखेर शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देत व त्यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करून हा कारखाना ओंकार शुगर्स यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारखाना सुरू झाल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा कारखाना केवळ शेतकर्‍यांच्या हिताला आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देईल, अशी ग्वाही दिली होती. शिवाय, या कारखान्यात कोणत्याही प्रकारच्या राजकारणात करण्यात येणार नाही, असा विश्वास दिला होता. निलंगेकर यांनी आपला शब्द पाळत कारखाना विनाराजकारण यशस्वीपणे चालविण्यास कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांना मदत केली आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार शुगर्सचा आता दुसरा गळीत हंगाम सुरू झाला असून, कारखान्याला ऊस देणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे कारखाना जास्तीत जास्त ऊसगाळप करत असून, ज्या शेतकर्‍यांनी गाळपास ऊस दिला आहे व आगामी काळातही देणार आहेत, त्या शेतकर्‍यांच्या उसास प्रतिटन 2700 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे.

तसेच सदर रक्कम ऊस दिलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रतिकूल परिस्थितीतदेखील यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील व कारखाना प्रशासन प्रयत्नशील असून, कारखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक उसाचे गाळप वेळेवर होईल, असा विश्वास आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. तसेच कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी व शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊसपुरवठा करावा, असे आवाहनही केलेले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT