Ambadas Danve-Chandrakant Khaire : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या संभाव्य शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील प्रवेशावरून जिल्ह्यातील दोन नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांचा विषय कालच एन्ड झाला, त्यांना पक्षात प्रवेश मिळालेला नाही, असा दावा केला. तर चंद्रकांत खैरे यांना त्यांचा विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांनी तो मांडला. पण माझ्या दृष्टीने खैरेंच्या विचारांपेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार महत्वाचे आहेत. हर्षवर्धन जाधव काल त्यांना भेटले आहे, दोघांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे उद्धवसाहेबच या संदर्भात निर्णय घेतली, असे सांगत अंबादास दानवे यांनी खैरे यांच्याशी पंगा घेतला.
कन्नडचे माजी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव सध्या नव्या पक्षाच्या शोधात आहेत. सत्ताधारी पक्षात जाण्याचा त्यांचा प्रश्नच नाही. सातत्याने ते राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षातील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाधव यांना जवळ करणार नाही. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या जुन्याच पक्षाचा आधार आता वाटू लागला आहे. अंबादास दानवे यांच्यामार्फत त्यांनी घरवापसीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु ज्या हर्षवर्धन जाधवमुळे चंद्रकांत खैरे यांना माजी खासदार व्हावे लागले, त्यांच्या पक्षप्रवेशाला त्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे.
हर्षवर्धन जाधव याची पक्षाला गरज नाही, शिवसेना, उद्धवसाहेब, माँसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या माणसाची आम्हाला गरज नाही, असे आज पुन्हा खैरे यांनी माध्यमांना सांगितले. छत्रपती संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरासमोर शौर्यदिनाच्या निमित्ताने महाआरतीसाठी खैरे-दानवे एकत्र आले होते. याचवेळी दोघांनी हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रेवशावर आपले मत मांडले. अंबादास दानवे हर्षवर्धन जाधव यांच्या घरी गेले होते, त्यामुळे काल हर्षवर्धन मुंबईला गेला होता की नाही हे मला माहित नाही, पण दानवेंना माहित असेल, असा टोला खैरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांची भेट झाली असली तरी हर्षवर्धन जाधव यांना पक्षात प्रवेश देण्यात आलेला नाही, असा दावा खैरे यांनी यावेळी केला. तर खैरे यांचा हा मुद्दा खोडून काढत जाधव यांच्याबाबतीत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. काल दोघांची भेट होऊन चर्चा झाली आहे. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मला माहित नाही? राहिला प्रश्न चंद्रकांत खैरे यांचा हर्षवर्धन जाधव यांना असलेल्या विरोधाचा तर त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण माझ्यासाठी खैरेंच्या विचारापेक्षा उद्धव ठाकरे यांचे विचार महत्वाचे आहेत, असे सांगत दानवे यांनी खैरे यांचे नेतृत्वच झुगारल्याचे दिसून आले.
एकीकडे हर्षवर्धन जाधव यांच्या न झालेल्या पक्ष प्रवेशावरून शिवसेनेतील चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे हे नेते पुन्हा एकमेकांना भिडले आहेत. तर दुसरीकडे ज्या जाधव यांच्यावरून पक्षात हे महाभारत सुरू आहे, त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भेटीत फक्त एकमेकांची वैद्यकीय स्थिती आणि देशाच्या अर्थकारणावर आपली त्यांच्याशी चर्चा झाल्याचे म्हटले आहे. पक्षप्रवेशावर कालच्या भेटीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
अंबादास दानवे यांनी आतापर्यंत ज्यांना ज्यांना पक्षात आणले, ते सगळे पळून गेले, अशी टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपचे (BJP) राजू शिंदे, सिल्लोडमध्ये सुरेश बनकर, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवर असे अनेकजण पक्षात आले. पण आज यांच्यापैकी एकहीजण पक्षात राहिलेला नाही. केवळ उमेदवारीसाठी लोकांना पक्षात आणून निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम केले गेले, असा आरोपही खैरे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.