Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Politics : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला पाणी प्रश्नाची आठवण; संभाजीनगरमध्ये चालंलय तरी काय?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची राजधानी आणि राज्याची पर्यटन राजधानी अशी ओळख असलेल्या संभाजीनगरकरांना दहा-बारा दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याचे राजकारण करत आपापली पोळी भाजून घेतली.

लोकसभा, विधानसभा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की संभाजीनगरकरांच्या पाणी प्रश्नांची सगळ्याच राजकीय पक्षांना आठवण होते.

2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना जाहीर केली होती. आता 2024 उजाडले तरी ही योजना पुर्ण झालेली नाही. 1680 कोटीची ही योजना आता 2300 कोटीवर पोहचली आहे. जायकवाडी धरणातील जॅक्वेलचे काम, शहरातील जलकुंभ आणि कंत्राटदाराकडून सुरू असलेले संथ गतीचे काम यामुळे ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात जोरदार फटका बसला. एकमेव छत्रपती संभाजीगरची जागा महायुतीला जिंकता आली. या विजयाची कारणे वेगळी असली तरी पाणीप्रश्न या सरकारला सोडवता आला नाही, याबद्दल लोकांच्या मनात नाराजी कायम आहे. आता विधानसभा निवडणुकीत विशेषतः शहरातील पूर्व-पश्चिम आणि मध्य अशा तीनही मतदारंघात पाणीप्रश्नाचा मुद्दा महायुती-महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कळीचा ठरणार आहे.

त्याआधाची त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न विद्यमान आमदारांनी सुरू केले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांना संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर तातडीने बैठक घ्यायला भाग पाडले. या बैठकीत संभाजीनगरकरांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी वेगवान पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे.

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने काम करावे यासाठी शुक्रवारी (ता. 12) रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील लोकप्रतिनिधी आणि मनपा आयुक्तासोबत बैठक घेत चर्चा केली. तसेच पाणीपुरवठा योजनेतील अडथळे तातडीने दूर करून पाणीप्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. शहराच्या पाणीप्रश्नासाठी आमची पूर्ण मदत राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिला.

महापालिकेला पाणीपुरवठा योजनेचा हिस्सा भरण्यासाठी 822 कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत शहराचा पाणी प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. या बैठकीला आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat, प्रदीप जैस्वाल नगरविकास सचिव गोविंदराज, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, शहर अभियंता देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT