Adarsh Scams News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel On Adarsh Scams : मंत्रिमंडळावर मोर्चे निघाले सोळा; पण चर्चा `आदर्श`च्या ठेवीदारांचीच...

AIMIM News : गोरगरिबांच्या आयुष्याची कमाई त्यांना परत मिळावी, यासाठी २० कोटींची तरतूद करा.

Jagdish Pansare

Aurangabad Political News : आदर्श नागरिक पतसंस्थेच्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. (Adarsh Scams News) शहरात विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने १६ मोर्चे मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आले. परंतु सर्वाधिक लक्ष वेधले ते आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील ठेवीदारांच्या मोर्चाने.

सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देताच परवानगी मिळाली. (AIMIM) भडकल गेट येथे हजारोंच्या संख्येने ठेवीदार आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले. मात्र, पोलिसांनी मोर्चा पुढे घेऊन जाण्यास मज्जाव करत त्यांना रोखले.

आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी पोलिसांचे बॅरिकेड तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी इम्तियाज जलील यांचा पोलिसांशी वादही झाला. मात्र, निवेदन स्वीकारायला मंत्र्यांना पाठवा नाहीतर आम्हाला तिकडे जाऊ द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली. (Scams) अखेर आमखास मैदानाजवळ ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले.

या वेळी आक्रमक झालेल्या इम्तियाज जलील यांनी सहकारमंत्र्यांसमोरच सहकार विभागाचे वाभाडे काढले. उपनिबंधक कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांनी कमावलेल्या कोट्यवधीच्या बेहिशेबी मालमत्ता आणि बदलीसाठी होणारे व्यवहार याची जंत्रीच मांडली. कोट्यवधींचा घोटाळा करून संचालक मंडळ आणि उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी मोकाट कसे? त्यांना तत्काळ अटक करा, चौकशी लावा, अशी मागणी करत इम्तियाज जलील यांनी मंत्र्यांनाही धारेवर धरले. दोन रस्ते कमी करा, पण गोरगरिबांच्या आयुष्याची कमाई त्यांना परत मिळावी यासाठी २० कोटींची तरतूद करा.

असे झाले तर ३५ हजार ठेवीदारांना ठेवी परत मिळू शकतील, असा दावा इम्तियाज जलील यांनी मोर्चेकर्‍यांसमोर केला. यावर गिरीश महाजन, वळसे पाटील यांनी अर्ध्या तासाचा वेळ मागून घेत इम्तियाज जलील व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेनंतर दीड महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. तसेच आदर्शच्या फरार संचालक व सहनिबंधक कार्यालयातील दोषींना आठ दिवसांत अटक केली जाईल, असा शब्दही दोन्ही मंत्र्यांकडून देण्यात आला. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आदर्शच्या ठेवीदारांचा मोर्चा कमालीचा यशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT