Mumbai News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर बीडमधील गुन्हेगारी महाराष्ट्रात गाजत आहेत. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा यात मास्टरमाईंड, असे म्हटले आहे.
आता या प्रकरणात तिथले स्थानिक नेते राम खाडे यांनी गंभीर आरोप करताना भाजप आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण सांगताना, पवनचक्कीचे कारण पुढं केले आहे. राम खाडे यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना धुमारे फुटले आहेत. अनेक जुन्या गुन्ह्यांना उघडपणे उजाळा दिला जाऊ लागला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा सहा डिसेंबरला निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर संपूर्ण बीड (BEED) जिल्हा हादरला. मयत देशमुख यांच्या हत्येच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही हत्या किती क्रूरतेने केली यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू् प्रकरणाचे पडसाद, नागपूर हिवाळी अधिवेशनात उमटले.
संतोष देशमुख यांच्या हत्येवर पहिल्यापासून भाजप (BJP) आमदार सुरेश धस आक्रमक आहेत. त्यांच्या आरोपांची सुई वाल्मिक कराड यांच्याकडे असली, तरी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. आता यावर तिथले सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी मोठा आरोप करत आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेला देखील संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
राम खाडे यांनी म्हटले आहे की, "रोज सकाळी उठून या घटनेवर आरोप केले जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तो तुम्हाला अधिकार आहे. परंतु मुंबई बँक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा अडीच वर्षापूर्वी आदेश झाला आहे. तरी गुन्हा दाखल झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे". मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला द्यावा. तसेच देवस्थान जमिनी प्रकरणात देखील लक्ष घालून न्याय द्यावा. यातील आरोपींवर कारवाई झाले पाहिजे, अशी मागणी केली.
"संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या माध्यमातून झाली आहे. ही पहिलीच व्यक्ती नाही. आष्टीमधील एका आदिवासी कुटुंबातील एका व्यक्तीचा हत्या झाली. ती अशीच दाबली आहे. दिवंगत लोकनेते गोपनाथ मुंडे, रामदास आठवले अनेक लोक त्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आले होते. ते प्रकरण कोणी दाबण्याचे पाप सुरेश धस यांनी केले. तसा माझा आरोप आहे. ही हत्या कोणी केली, याची देखील चौकशी झाली पाहिजे. काकडे यांच्या फाशीचे प्रकरण देखील असेच आहे. किती जणांच्या जमिनी लाटल्या आहेत, सर्व काही समोर येईल. मच्छिंद्रनाथ देवस्थानची चौकशी केल्यास सर्व काही उघडं पडेल. पण हे चौकशीच करून दिली जात नाही. पण खोटे गुन्हे दाखल केले जातात", असा आरोप राम खाडे यांनी केला.
"वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल करायचे, त्यावर काय कारवाई करायची आहे, तो सरकारचा अधिकार आहे. वाल्मिक कराड याने मला देखील त्रास दिला होता. तो सुरेश धस यांच्या माध्यमातून दिला होता, असा आरोप केला. आपण देखील अडचणीचे माणसं आहात. आरोप करण्याची चाललेली पद्धत थांबवा. मुख्यमंत्री यांनी ठरवलं तर, तुमच्या देखील 'आक्का' बाहेर येतील", असा इशारा राम खाडे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.