Beed news : आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, अशा शब्दात राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडच्या जनतेला आवाहन केले. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पालकमंत्री पद स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनानिमित्त आज बीडमध्ये आल्या होत्या.
सुनेत्रा पवार यांचा आजचा बीड दौरा हा वेगळ्या अर्थाने जिल्ह्यासाठी महत्त्वाचा होता. अजित पवारांची बीडसोबत जोडली गेलेली नाळ सुनेत्रा पवार यांच्या आजच्या आश्वासक भाषणानंतर अधिक घट्ट होणार, असा विश्वास बीडकरांच्या मनात निर्माण झाला.
मराठवाड्याची भूमी संतांची, वीरांची आहे. संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी माझा जन्म झाला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि अत्यंत कमी वेळामध्ये ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली. बीडसाठी त्यांच्या मनामध्ये अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते ते पूर्ण करण्यासाठी ते झपाटून कामाला लागले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या विकासाच्या वाटचालीमुळे जिल्ह्याला एक नवीन दिशा मिळाल्यासारखं मला वाटत होतं आणि त्यांच्या पश्चात पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आली.
महाराष्ट्र दिनाच्या या मंगलदिनी आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात हातभार लावू आणि एक विकसित सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करू, असे आव्हानही सुनेत्रा पवार यांनी बीडकरांना केले. आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली. उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श निर्माण केल्याबद्दल आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी मुंबईत विशेष सन्मान करण्यात आला हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील युवकांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि कौशल्य मिळावे यासाठी टाटा टेक्नॉलॉजीसह एमआयडीसी मध्ये सुमारे 117 कोटी रुपयांचा आयटी प्रकल्प उभारण्यात येत आहे. याचा 60000 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय महिला आणि पुरुष हॉलीबॉल तसेच खो-खो स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यानंतर हॉलीबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा देखील बीडमध्ये होणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले
बहुप्रतिक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे जिल्ह्यामध्ये धावली, आता परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा विकास होणार आहे.
जिल्ह्यासाठी 623 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. तसेच आजपासून राष्ट्रीय जनगणनेला प्रारंभ झाला आहे, त्यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपलं योगदान द्यावे, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले. बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातला अग्रगण्य जिल्हा बनवूया, सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख ठळकपणे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.