विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने हिंगोली जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
याआधी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पक्षांतर्गत कुरबुरीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
आजी-माजी आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसची जिल्हास्तरीय जबाबदारी सुरेश आप्पा सराफ यांच्याकडे देण्यात आली आहे.
Hingoli News : संजय कापसे
जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्या विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. त्याआधी पक्षांतर्गत कुरबुरीमुळेच माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. एकापाठोपाठ एक असे हिंगोली जिल्ह्यातील दोन काँग्रेसचे आजी-माजी आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर आता पक्षाची धुरा जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पक्षाने एकदा नव्हे तर दोनदा विधान परिषदेवर संधी दिली. परंतु त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी सातव यांना करून घेता आला नाही. पक्ष संघटन हळूहळू खिळखिळे होत गेले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, जिल्हाअंतर्गत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विविध नियुक्त्यांवरून बेबनाव असे प्रकार समोर आले.
यातूनच विधानसभा निवडणुकीला उमेदवारी डावल्याचे कारण देत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या संजय बोंढारे यांनीही त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेत प्रवेश केला. तर दिलीप देसाई यांनी भाजपचा मार्ग निवडला. त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश आप्पा सराफ कळमनुरीचे जकी कुरेशी, वसमतचे हाफिज भाई बागवान यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांवर आता नव्याने पक्ष बांधणीची जबाबदारी येऊन ठेपली आहे. सुरेश आप्पा सराफ यांनी हिंगोली येथे आज पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेत पक्षाची एकजूट कायम राखण्याचे आवाहन केले. तर कळमनुरी येथे जकी कुरेशी यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्ष संघटन वाढीसाठी झपाटून कामाला लागा, असे आवाहन केले.
1. डॉ. प्रज्ञा सातव यांनी कोणता पक्ष सोडला आहे?
➡️ त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
2. हिंगोलीतील आणखी कोणत्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडला होता?
➡️ माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
3. या घडामोडीमुळे काँग्रेसवर काय परिणाम झाला?
➡️ जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्व कमकुवत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
4. हिंगोली काँग्रेसची जबाबदारी आता कोणाकडे आहे?
➡️ जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश आप्पा सराफ यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे.
5. पुढील काळात काँग्रेस काय रणनीती आखू शकते?
➡️ नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.