Beed News, 04 Dec : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली. नगरपरिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट मतदार संघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती, असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे.
परंतु बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचा बचाव करण्याचा आरोप असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची उणीव भासत असल्याचे केलेले विधान यावरून बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले होते. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
त्यानंतर सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता सुरेश धस यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत घेतलेली भेट केवळ विकास कामांसाठीच होती की या भेटीत महाराष्ट्रासह देशभरात व दिल्लीतही चर्चा झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी होती? याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.
सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी मोठे आंदोलन राज्यभरात न्याय मोर्चाच्या माध्यमातून उभे केले होते. या राजकीय दबावातूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपींना अटक झाली होती.
याशिवाय तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मीक कराड यांच्याशी असलेले संबंध, कृषिमंत्री असताना शेती अवजारे व औषधी साहित्य खरेदी घोटाळा अशा प्रकारचे आरोप करत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता.
सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीतून झालेले अपहरण आणि त्यानंतर करण्यात आलेल्या अमानुष हत्या प्रकरणानंतर सुरेश धस हे गेल्या वर्षभरापासून कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणारे आमदार ठरले होते. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोपही धस यांनी केले होते.
हा सगळा घटनाक्रम आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आणि त्यांचा बचाव करणाऱ्या नेत्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी अमित शहा यांना पत्र देऊन व प्रत्यक्ष भेटीत केली होती. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
स्वतः सुरेश धस यांनी मात्र ही भेट आष्टी विधानसभा मतदार संघातील पर्यटन व धार्मिक विकास कामांसाठी होती असे म्हटले आहे. आष्टी मतदार संघात अनेक प्राचीन, ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश असून दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असतात. तथापि, या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपेक्षित प्रमाणात विकास साधता आलेला नाही, ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.
धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी “प्रसाद योजना” (तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील एकूण 50 तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्याकडे औपचारिक मागणी केली आणि यासंदर्भात सविस्तर भेट घेऊन चर्चा केली.
या चर्चेदरम्यान संबंधित विभागामार्फत तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देण्याची विनंती केली. आष्टी मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा विकास व्हावा, तसेच भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील, याची मी नागरिकांना खात्री देतो, असे सांगत धस यांनी या भेटीबाबत माहिती देणाऱ्या आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.