Talathi Exam Fraud  Sarkarnama
मराठवाडा

Talathi Exam Fraud : तलाठी भरती परीक्षेत कॉम्प्युटर हॅक करून दिला पेपर ? धक्कादायक माहिती समोर

Shital Waghmare

Dharashiv News : तलाठी भरती जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने गैरव्यवहाराचा आरोप करत ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. जाहिरात निघाली उमेदवारी अर्ज भरले. यानंतर परीक्षा झाली. मात्र, आता धक्कादायक माहिती समोर आली असून, चक्क कॉम्प्युटर हॅक करून पेपर दिल्याची माहिती समोर आली आहे. (Talathi Exam Fraud in Latur)

तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच या परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी गैरव्यवहाराच्या तक्रारीचा सूर लावला होता. यानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मयूर दराडे व प्रमोद केंद्रे यास अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 पासून रखडलेली तलाठी भरतीची परीक्षा राज्य सरकारने जून 2023 मध्ये घोषित केली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी 4 हजार 600 पदांसाठी तलाठी भरतीसाठी जाहिरात काढली. तलाठी परीक्षेसाठी राज्यभरातून दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 51 सत्रात ही परीक्षा पार पडली. मात्र, आता या परीक्षेच्या लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर काॅम्प्युटर हॅक करून पेपर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणी धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी आनंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आलेल्या तक्रारीनुसार, प्रशासनाने चौकशी करून यात तथ्य आढळल्याने अधिक सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये हॅक करून प्रश्नपत्रिका सोडविल्याचे समोर आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील निवड झालेल्या खुल्या प्रवर्गातील निवड यादीमध्ये मयूर श्रीहरी दराडे व प्रमोद रामराव केंद्रे या दोन उमेदवारांच्या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 'टीसीएस' कंपनीचे झोनल डिलिव्हरी मॅनेजर यांनी चौकशी केली. या चौकशीत हे दोन्ही उमेदवार दोषी आढळले. पोलिसांनी टीसीएस कंपनीच्या अहवालानुसार, केंद्रे व दराडे यांची चौकशी केली.

त्यांनी सांगितले की, लातूर येथील राजू कांबळे हा ऑनलाइनचे काम करतो. त्याची व केंद्रेची जुनी ओळख आहे. कांबळेंनी केंद्रे यास सांगितले की, 30 ते 35 लाख रुपये दिल्यास तलाठी परीक्षेचा पेपर फोडून देतो. त्यास केंद्रे यांनी संमती दिली. पुढे कांबळे यांनी केंद्रेची ओळख सचिन मुळे यांच्याशी करून दिली. राजू, सचिन व त्या अनोळखी इसमाने प्रमोद केंद्रे याची सर्व ओरिजनल कागदपत्रे घेऊन ठेवली, तसेच निवड झाल्यानंतर सर्व पैसे दिल्यानंतर कागदपत्रे घेऊन जा असे सांगितले.

प्रमोद हा या तिघांना फोनवर बोलतही होता आणि भेटलाही होता. प्रमोदने 29 ऑगस्ट 2023 रोजी लातूर येथील परीक्षा सेंटरवर परीक्षा दिली. या परीक्षेच्या 30 मिनिटे अगोदर सचिनने केंद्रेची एका अनोळखी माणसाबरोबर ओळख करून दिली. त्या अनोळखी माणसाने केंद्रेला सांगितले की, परीक्षा आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आणि परीक्षेसाठी इंग्रजी माध्यम निवडायचे.

सुरुवातीला परीक्षेतील सर्व प्रश्न पाहून घ्यायचे. त्यानंतर स्क्रीनवर एक दुसरा माऊस येईल. हा माऊस त्या प्रश्नाचे जे उत्तर असेल, त्या ठिकाणी तो कर्सर दाखवेल. त्या पर्यायावर क्लिक करायचे असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे केंद्रे यांनी उत्तरे सिलेक्ट केली. निवड झाल्यानंतर केंद्रे यांनी संबंधितांकडे कागदपत्राची मागणी करून त्यांना सहा ते सात लाख रुपये दिले.

याच प्रकरणातला दुसरा उमेदवार मयूर दराडे यानेही असे सांगितले की, त्याने 1 सप्टेंबर 2023 रोजी लातूर येथे तलाठीची परीक्षा दिली. या घडलेल्या गोष्टीची माहिती त्याच्या वडिलांना आहे. वडिलांनी सांगितल्यानुसारच त्याने तलाठी परीक्षा दिली. त्यालाही परीक्षा केंद्रावर एक अनोळखी इसम भेटला. त्याने सांगितल्याप्रमाणे लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून परीक्षेचे माध्यम इंग्रजी निवडले.

सुरुवातीला सर्व प्रश्नांना भेट दिली व नंतर आलेल्या दुसऱ्या माऊसने दाखवलेल्या पर्यायावर त्याने क्लिक केले. या दोन्ही उमेदवारांनी तलाठी परीक्षेमध्ये संगणक हॅक करून पेपर सोडविण्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार धाराशिव येथील आनंदनगर पोलिस स्टेशन येथे 379, 419, 420, 468 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत 66 66 (क) 66 (ड) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवी सानप करीत आहेत.

'टीसीएस'ने चौकशीत काय निष्कर्ष काढले ?

1) उमेदवारांनी दुपारी 1:43 पासून, विभाग 13 वेळा बदलले गेले आणि काही प्रश्नांना 18 वेळा भेट देण्यासाठी क्रमांक पॅनेलचा वापर केला गेला आणि 3 प्रश्नांसाठी प्रतिसाद दिला गेला आणि परीक्षा संपेपर्यंत 1.43 PM दरम्यान दुसरा कोणताही प्रतिसाद बदलला नाही.

2) या दोन उमेदवारांच्या वरील तपशीलवार लेखापरीक्षण लॉगच्या विश्लेषणाच्या आधारे, पहिल्या 30 मिनिटांत सर्व प्रश्नांना भेट दिल्यानंतर त्यांना अंदाजे 40 मिनिटांत सर्व 100 प्रश्नांची उत्तरे देता आली. अशा परीक्षांमध्ये उत्तर देताना हे असामान्य वर्तन म्हणून हायलाइट केले जाऊ शकते आणि त्यामुळे या उमेदवारांवर संशय निर्माण होतो.

शिफारशी :

वरील निरीक्षणे आणि विश्लेषण निर्णायक नाहीत, परंतु असामान्य वर्तनामुळे निश्चितपणे संशय निर्माण झाला आहे. म्हणून TCS ION हे विश्लेषण निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील कृती करण्याची शिफारस करते.

1) परीक्षेदरम्यान या उमेदवारांच्या कोणत्याही असामान्य वर्तनासाठी दोन्ही उमेदवारांच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये या उमेदवारांसह कोणत्याही परीक्षा कार्यकर्त्यामध्ये काही संवाद झाला आहे का ? हे पाहण्यासाठी तपासणेदेखील समाविष्ट असू शकते.

2) या उमेदवारांना तपास यंत्रणा पुढील चौकशीसाठी बोलावू शकतात आणि त्यांना इतक्या वेगाने अशा प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याची क्षमता सिद्ध करण्यास सांगितले पाहिजे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT