teachers protest Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईविरोधात शिक्षकांचा एल्गार मोर्चा, राज्यभरात काळी फित लावून करणार निषेध!

Chhatrapati Sambhajinagar Teachers Association : वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईविरोधात गंगापूर-खुलताबादमधील १०८६ शिक्षकांवरील तीन वर्षे वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईविरोधात १५ सप्टेंबरला एल्गार मोर्चा काढण्यात येणार असून राज्यभर शिक्षक काळी फित लावून निषेध करणार आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Teachers Association : मुख्यालयी न राहणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील १०८६ शिक्षकांवर तीन वर्ष वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या या कारवाईच्या विरोधात शिक्षक संघटना संतप्त झाल्या असून उद्या १५ सप्टेंबर रोजी गंगापूरमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

या शिवाय शिक्षकांवरील या कारवाईच्या विरोधात उद्या राज्यभरातील शिक्षक हे काळी फित लावून प्रतिकात्मक आंदोलन देखील करणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत राज्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद पंचायत समिती अंतर्गत १०८६ शिक्षकांवर मुख्यालयी न राहिल्याच्या कारणावरून वेतनवाढ बंद करण्याची कारवाई करण्यात आल्याचा दावा शिक्षक समितीने केला आहे. शिक्षकांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून न देता मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे आणि त्याआधारे आर्थिक स्वरूपाची शिक्षा करणे अन्यायकारक असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

शिक्षक समितीच्या वतीने या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला असून, शिक्षकांना शासकीय निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तसेच करण्यात आलेली अन्यायकारक कारवाई तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी १५ सप्टेंबर रोजी गंगापूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गंगापूर- खुलताबाद येथील शिक्षकांवर एकतर्फी कारवाई करून एक वेतन वाढ तीन वर्षासाठी बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने निर्गमित केले असून या कारवाईने शिक्षकांमध्ये अतिशय संताप व्यक्त होत आहे. ही कारवाई केवळ दोन तालुक्यातील शिक्षकांसाठी दिसत असली, तरी भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात व कालांतराने राज्यभरात याचे पडसाद उमटतील, अशी भिती शिक्षकभारती संघटनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

शिक्षकभारती गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मुख्यालयी राहण्याच्या संदर्भात मंत्रालयीन कर्मचाऱ्याप्रमाणे मुख्यालय हे 30 कि.मी. परिघक्षेत्र समजण्यात यावे अथवा निवासस्थाने बांधून द्यावे अशी मागणी करत आहे. परंतु शासन याबाबत चालढकल करत आहे. शिक्षकांवर झालेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्यात यावी तसेच मुख्यालयी संदर्भात ठोस भूमिका घेण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा या बैठकीत देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT