ashok chavan | samruddhi highway
ashok chavan | samruddhi highway sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांची स्वप्नपूर्ती, जालना- नांदेड समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी आली समोर

Jagdish Pansare

Nanded News, 25 May : महाराष्ट्र राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला ( Samruddhi Highway ) मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली हा भाग जोडला जावा, अशी मागणी माजी मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना केली होती. मराठवाड्यातील हे जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडले जावेत, या त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आता होताना दिसते आहे.

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या निविदा शुक्रवारी ( ता. 24 ) उघडण्यात आल्या एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी आनंद व्यक्त केला आहे. अशोक चव्हाणे म्हणाले, "कनेक्टिव्हिटी हा विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक असतो आणि नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अधिक वाढावी, यासाठी चार वर्षांपूर्वी नांदेडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे असताना जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पावर आम्ही काम सुरू केले."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून या प्रकल्पाला आम्ही मंजूर मिळवली. 8 मार्च 2021 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 7 सप्टेंबर 2021 रोजी शासन निर्णय जारी झाला. 12 नोव्हेंबर 2021 रोजी भूसंपादनासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले आणि आता निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली असून, निविदा उघडण्यात आल्या," अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

"या प्रकल्पासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपल्या सर्वांचे समर्थन आणि सहकार्याच्या बळावर पुढील पाच-सहा वर्षात जालना-नांदेड महामार्गासह नांदेड जिल्ह्यातून जाणारे अनेक महत्वाचे रस्ते व रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे," अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अशोक चव्हाण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गात नांदेड नसल्याची सल अशोक चव्हाण यांना होती. केवळ नांदेडच नाही तर शेजारच्या हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांनाही समृद्धी महामार्गाचा भाग होता यावे,यासाठी चव्हाण यांनी जोर लावला होता.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच नांदेड -जालना या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यात त्यांना यश आले होते. त्या पुढील अनेक प्रक्रिया पार पाडत हा प्रकल्प निविदा प्रक्रियेपर्यंत पोहोचला होता. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि जालना-नांदेड समृद्धी महामार्गाची प्रक्रिया रखडली. सत्तांतरानंतर हा प्रकल्प पूर्ण होतो की नाही? अशी शंका उपस्थित केली जात होती.

परंतु, नांदेड आणि एकूणच मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला महायुतीच्या सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आणि निविदा उघडण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असताना मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होताना अशोक चव्हाण हे सत्ताधारी पक्षात आहेत.

भाजपचे विद्यमान खासदार म्हणून या निर्णयाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाची अनेक शिखरे गाठेल,असा विश्वासही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT