Bjp Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

दहशत-माफिया राज बोकाळलायं, रावणाला सुद्धा शक्तीचा गर्व होता ; पंकजा मुंडेचा रोख कुणाकडे?

Dattatrya Deshmukh

बीड : काही जण म्हणतात खूप अवघडयं, आम्हाला नगरपरिषद निवडणूकीत उमेदवार मिळणार नाहीत, हो हे खरयं, कारण दहशत आणि माफिया राजच तेवढा बोकाळलायं, रावणाला सुध्दा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. पण श्रीरामाच्या वानर सेनेने त्याला पराभूत केलं, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लगावला. त्यांनी कोणाच नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कोणाकडे हे स्पष्ट आहे.

कारण, आठच दिवसांपूर्वी परळी येथीलच दिवाळी स्नेहमिलनात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीत विरोधकांना उमेदवारही मिळणार नाहीत, असे आव्हान दिले होते. रविवारी पंकजा मुंडे यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलनात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या टिकेला उत्तर दिले.

मला सुध्दा वानर सेना घेऊन लढता येतं. अजून लढाई संपलेली नाही, त्यांना घेऊनच ही लढाई लढायचीय. एकदा बघाच, नितिमत्ता गहाण ठेऊन मी कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. मी असे उमेदवार देईल जे द्वारपाल बनून जनतेची कामं करतील, मतं खरेदी करून त्यांना देशोधडीला लावणार नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला टिका नाही कामं करायचीत. परळीकरांनी गोपीनाथराव मुंडेंसारखा लोकनेता देशाला दिलाय, मलाही भरभरूर प्रेम दिलं. त्यामुळे परळीकरांचा मला अभिमान आहे. काहीही मिळवायची मला लालसा नाही, माझं ध्येय, माझा कारभार आणि माझे कार्यकर्ते देखील स्वच्छ आहेत. त्यांना ताकद द्यायचीयं.

परळीत विषाची नाही तर अमृताची वेल लावायचीय, परळीचं नांव खाली जाईल असं काम माझ्या हातून कदापिही होणार नाही, असा विश्वास देखील पकंजा मुंडे यानी उपस्थितांना दिला. लोकशाहीमधील राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, आपले सैन्य शेतकऱ्यांच्या पिकातून गेले तरी सैन्याला शिक्षा करणारा, शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असणारा हवा.

तुम्ही मला दहा वर्षे आमदार केले. मी राज्य आणि देशभर मिरवले, मी कुठेही गेले तरी मला लोक विचारतात तुमचा मतदारसंघ कोणता? मी सांगते परळी वैजनाथ आहे. दिवंगत मुंडेंच्या राजकीय आयुष्याची सुरुवात परळी मतदारसंघातून झाली. आपल्यामुळे मतदारसंघाचे नाव खराब होऊ ही जबाबदारी माझ्या खांद्यावर असायची.

आताही मी कुठेही गेले तरी मी माझ्या सत्ताकाळात राबविलेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून सांगतात. शासकीय योजनांसोबतच सामाजिक कामंही तेवढ्याच हिररिने केले. 'घार उडे आकाशी' याप्रमाणे माझं परळीवर लक्ष आहे. कुणी म्हणतात मला उचक्या लागतात. पण आज शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, कोणती कामं होत नाहीत, टोल द्यावे लागतात, त्यामुळे जनतेला मी केलेल्या चांगल्या कामाची आठवण येते.

मला विरोधकांवर टिका करायची नाही, त्यासाठी त्या पातळीवर मला जायचं देखील नाही. मी सकारात्मक कामावर बोलणारयं. तुमच्यासाठी मला सतत लढायचयं. मी हरले नाही की खचले नाही, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आपल्याला पुन्हा कामाला लागायचं आहे.ही लढाई संपलेली नाही. कांही लढाया हरू कांही जिंकू पण समाजाच्या हिताचं अमृत मिळवण्यासाठी हलाहल पचवावे लागेल त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे, असेही पंकजा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT