Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Farmers issue : शेतकरी आत्महत्यांवरून ठाकरे गट आक्रमक ; दानवेंनी दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा!

Jagdish Pansare

Shiv Sena Thackeray group and Farmers issue : अवकाळी पाऊस, पाणी टंचाई, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, पीक कर्ज मिळाले नाही म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना 10 जूनची डेडलाईन दिली आहे.

तोपर्यंत मागणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही, तर या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. तसेच पीक कर्ज नाकारले म्हणून झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधित बॅंकेच्या मॅनेजर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी केली. सोमवारी बॅंक मुख्य व्यवस्थापकांच्या बैठकीत दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

10 जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रलंबित कर्ज प्रकरणे मार्गी लावा, नाहीतर जिल्ह्याभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बँकांविरोधात आंदोलन उभे करेल. जिल्ह्याची लीड बँक म्हणून संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुट्टा येथे 28 मे रोजी विठ्ठल नामदेव दाभाडे या शेतकऱ्याने पीक कर्ज नाकारल्यामुळे केलेल्या आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, झाला पाहिजे, अशी भूमिकाही दानवे यांनी या बैठकीत घेतली.

जिल्ह्याभरात बँका शेतकऱ्यांना सिबिलमुळे पीक कर्ज नाकारत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सिबिल न तपासण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन होत नसून सिबिल तपासून कर्ज प्रकरण मंजूर अथवा नामंजूर करणाऱ्या बँकांवर कारवाई करा, अशा सूचना दानवेंनी बैठकीत दिल्या.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, ठिबक सिंचन अनुदान व नुकसान भरपाई अनुदानावर बँका होल्ड लावत असून शासन शेतकऱ्यांना मदत करत असताना यामध्ये बँकानी आडकाठी आणण्याचे काहीही कारण नाही. बँक शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करत नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणून कळवावे. प्रकरणे प्रलंबित ठेवून बँक मॅनेजर भ्रष्टाचारला प्रोत्साहन देतात. यामुळे टक्केवारी पद्धत रूढ होत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.

शेतकरी पीक कर्ज बी - बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी घेत असतात. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांना कर्जाची अत्यंत गरज भासणार आहे. अशावेळी जाचक अटी न घालता तातडीने कर्जे उपलब्ध करून दिले पाहिजे. संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुट्टा येथील शेतकऱ्याने जमीन गहाण ठेवून सुद्धा बँक मॅनेजर यांनी त्याला कर्ज नाकारले.यामुळे सदरील शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. हा बँक मॅनेजर या हत्येस कारणीभूत असून त्याला सोडणार नाही, अशा इशारा दानवे यांनी बैठकीत दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT