Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : "जनतेच्या हातातून गाड्या हिरावून हातगाड्या देणे हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?"; इंधन टंचाईवरून ठाकरेंच्या पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल!

महाराष्ट्रातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. जनतेच्या हातातून गाड्या हिरावून हातगाड्या देणे हा सरकारचा मास्टरस्ट्रोक आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपावर दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा असल्या तरी सरकारकडून मात्र टंचाई नसल्याचे वारंवार सांगीतले जात आहे. सरकारच्या या दाव्याची पोलखोल करणारे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही सरकारच्या दाव्यांवर टीका करतांना वस्तुस्थिती मांडत टीका केली आहे.

देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ 'सर्कस' सुरू आहे. पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट 'साठेबाज' ठरवून मोकळे होतात. या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग पुरवठा विभाग झोपला आहे का? असा थेट सवाल करत सरकारच्या साठेबाजीच्या दाव्यातील हवा काढली.

दुसरीकडे, जालना जिल्ह्यात काल 'शाही फर्मानाचा' कळस पाहायला मिळाला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल देणार नाही, असा फर्मान काढण्यात आला. पण जे गरीब शेतकरी नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात, त्यांनी डिझेल कुठून आणायचे, यावर स्पष्टीकरण यात नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन, त्यांच्या हातात 'हातगाड्या' देणे, हाच या सरकारचा 'मास्टरस्ट्रोक' दिसतोय, व्वा रे महायुती अन् व्वा रे एनडीए, असा टोला दानवे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.

मराठवाड्यात शेतीच्या मशागतीची कामे डिझेलअभावी रखडली आहेत. अनेक पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन घेऊन रात्र काढत आहेत. शेतीची कामे खोळंबल्याने याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर आणि महागाईत होणार आहे. अशावेळी सरकारने प्रभावी उपाय योजना करण्याऐवजी शेतकऱ्यांना सातबारा असेल तरच डिझेल देण्याचा चमत्कारीक आदेश काढला. यावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करतांना मराठवाड्यातील वस्तुस्थिती मांडली. स्वतः दानवे यांना आपल्या गाडीत डिझेल भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या एका पेट्रोल पंपावर तीन तास चालकाला रांगेत उभे करावे लागले होते. आमदारांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यचं काय? असा प्रश्न या निमित्ताने करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT