Umarga Congress News Sarkarnama
मराठवाडा

Umarga Congress News : काँग्रेसमधील वादावादीनंतर प्रकाश आष्टे यांच्या सचिव पदाला ब्रेक..

Jagdish Pansare

अविनाश काळे

Congress Political News : विधानसभा निवडणुक महिनाभरावर आलेली असताना उमरगा मतदारसंघातील काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. माजीमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवा, असा सूर स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधून निघत होता. पण यावर विचार न करता उलट बसवराज पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकास आष्टे यांचीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव पदी वर्णी लावण्यात आली होती.

या नियुक्तीवरून तालुक्यातील काँग्रेस (Congress) नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. प्रकाश आष्टे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुरवात झाली. आष्टे यांच्या नियुक्तीला तातडीने पक्षातूनच आव्हान देण्यात आल्यानंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या स्थगितीचे पत्रच आज सोमवारी समोर आले. समाज माध्यमावर देखील प्रकाश आष्टे यांच्या प्रदेश सचिव पदाचा निर्णय स्थगित झाल्याच्या पोस्ट स्थगिती आदेशाच्या पत्रासह व्हायरल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान काँग्रेस पक्षातील वाद हा नवा नाही, त्याला पूर्व इतिहासाची झालर आहे. उमरगा, लोहारा तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारा सर्व जाती, धर्मातील मोठा वर्ग आहे. फुलचंद गांधी, विश्वंभरराव हराळकर यांनी प्रत्येकी एक टर्म, भास्करराव चालुक्य तीन टर्म, खालेकमियाँ काझी दोन टर्म हे दिवंगत लोकप्रतिनिधी व बसवराज पाटील एक टर्म काँग्रेसचे आमदार होते. विजयसिंह चालुक्य शेकापचे तर राजारामबापू पाटील, भाऊसाहेब बिराजदार हे दोघे एस काँग्रेसकडून निवडूण आले होते.

1995 च्यानंतर मात्र काँग्रेसला धक्के बसत गेले. तरीही एक टर्म बसवराज पाटील यांनी मोठ्या संघर्षातुन यश मिळवले होते. शिवसेनेचे प्रा. रविंद्र गायकवाड दोन वेळा तर सलग तीन टर्म ज्ञानराज चौगुले मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. (Dharashiv) बसवराज पाटील यांची सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर मजबुत पकड होती. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडीचा प्रकार तालुक्याला नवा नाही. दिवंगत आमदार खालेकमियाँ काझी यांच्या कार्यकाळात दिवंगत सुरेश पाटील तालुकाध्यक्ष होते.

वरिष्ठ पातळीवरून दिवंगत शिवाजीराव चालुक्य यांची तालुकाध्यक्ष म्हणुन निवड झाली. कालांतराने अंतर्गत कुरघोडीतुन अशोकराव जवळगे तालुकाध्यक्ष झाले होते. मात्र त्यांचे पद क्षणिक ठरले, त्यांच्या सत्कार कार्यक्रमातच पद रद्द झाल्याचे पत्र प्राप्त झाले होते. चालुक्य भाजपामध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीची धूरा बसवराज पाटील यांच्याकडेच होती.

दरम्यान, पाटील लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपामध्ये गेल्यानंतर चित्र पालटले. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांनी पद शाबुत ठेवण्याची खेळी केली. लोकसभा निवडणुकीत दोघेही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेच्या व्यासपीठावर होते. पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर काँग्रेस पक्षाला नवसंजिवनी देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती.

पाटील यांचे विरोधक असलेले लातुरचे आमदार अमित देशमुख यांचे बळ मिळत होते. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख, मधुकर यादव, विजय वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी पक्षाला बळ देण्यासाठी कार्यक्रम घेतले. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आष्टे यांची प्रदेश सचिवपदी निवड झाल्यानंतर कॉंग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. तो स्थगिती मिळवण्यापर्यंत गेला आहे. काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह पुढे किती उग्र रुप धारण करतो हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT