Kavtha Village Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : हजार उंबरे, ५ हजार लोकसंख्येच्या गावात चूल पेटली नाही, अख्खे गाव उपाशी

Mayur Ratnaparkhe

अविनाश काळे-

Maratha Community Fast : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. विविध मार्गाने आंदोलनं केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पाच हजार लोकसंख्या आणि एक हजार उंबऱ्यांच्या कवठा (ता. उमरगा, जि. धाराशिव) या गावातही चूल बंद आंदोलन करण्यात आले. आज (शनिवार) या गावातील एकाही घरात चूल पेटली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आऱक्षणासाठी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. गावागावांत साखळी उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कवठा या गावातील शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नागरिकही या उपोषणात सहभागी होत आहेत. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने चूल बंद आंदोलन करण्यात आले. महिलांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विनायकराव पाटील म्हणाले, ''मराठा आरक्षणासाठी काही वर्षांपूर्वी शांततेत लाखोंच्या सहभागाने मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र दोन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. मात्र मराठा समाजातील सर्वसामान्य तरुण आत्महत्या करून आपला जीव गमावू लागले आहेत. दिलेल्या मुदतीत शासनाने मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. गरजवंत मराठ्यांचा हा लढा अराजकीय आहे.''

याशिवाय ''जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अखेरच्या क्षणापर्यंत लढत रहाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्राणांची आहुती द्यायची तयारी आहे.'' असेही विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले.

या वेळी विजयकुमार सोनवणे, व्यकंटराव सोनवणे, विकास पाटील, भरत पाटील, जगन पाटील, मलंग गुरुजी, डॉ. डी. पी. गरुड, नितीन पाटील यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची बौद्ध बांधवांची मागणी-

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला उमरगा तालुक्यातील बौद्ध बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन शनिवारी उमरगा तालुका समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

उमरगा शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी  शनिवारी रेखा सूर्यवंशी, सुनंदा माने, मीरा चव्हाण, संध्या शिंदे, लता भोसले, वर्षा सूर्यवंशी, अनुराधा पाटील, ॲड. अर्चना जाधव, डॉ. रेणुका मोरे आदींनी उपोषण केले. त्यांना बौद्ध समाज बांधवांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

यावेळी  कैलास शिंदे, दिलीप भालेराव, हरीष डावरे, विजय वाघमारे, दिग्विजय शिंदे, राम गायकवाड, चंद्रकांत कांबळे, कमलाकर सूर्यवंशी, बाबूराव गायकवाड, दत्ता रोंगे, माजी नगरसेवक विक्रम मस्के, दगडू भोसले, धीरज बेळंबकर, अनिल व्हंताळकर, सचिन माने, ॲड. मल्हारी बनसोडे, ॲड. हिराजी पांढरे, प्रा. शरद गायकवाड उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT