Mla Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Sambhaji Patil Nilangekar : दिशाहीन राजकारण्यांना दिशा दाखविण्याचे साहित्य घडावे...

राम काळगे

Latur Political News : साहित्य आणि लेखणीच्या माध्यमातून अनेक क्रांती घडल्या असून, साहित्यामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. साहित्याने वेळोवेळी समाज व इतर ठिकाणी घडणार्‍या घटनांचे विश्लेषण करून सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले आहे. (Marathi Sahitya Sammelan News) सध्या राजकारणात अनेक चढउतार होत असून, अनेक राजकीय मंडळी दिशाहीन झालेली आहेत. साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून दिशाहीन राजकारण्यांना दिशा दाखविण्याचे साहित्य घडवावे, अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या बाबींवरही परिसंवाद घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. (Latur) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ व अनंतपाळ नूतन विद्यालय शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वामी रामानंद तीर्थ साहित्यनगरीमध्ये एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून (Sambhaji Patil Nilangekar) निलंगेकर बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासह मराठवाडा मुक्ती संग्रामचा यज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी मराठी साहित्याने मोठे योगदान दिले आहे. (Marathwada) मराठी साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदविणार्‍यांचा उत्साह वाढविण्यासाठी नेहमीच प्रभावशाली साहित्य लिहून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. जगात विविध क्रांती याच माध्यमातून घडल्या. त्याचबरोबर राष्ट्रभावना अधिक प्रबळ करण्यासाठी साहित्यिकांनी सातत्याने आपली लेखणी चालवली असून, लेखणीतील ही ताकद अनेकांना झुकविणारी आहे.

सध्याच्या राजकारणात काम करणारी अनेक राजकीय मंडळी दिशाहीन झालेली असल्याने राजकारणही गढूळ होऊ लागले आहे. या दिशाहीन राजकीय मंडळींना दिशा दाखवून राजकारणातही क्रांती घडविणारे साहित्य लेखणीच्या माध्यमातून साहित्यिकांनी घडवावे, अशी अपेक्षा निलंगेकर यांनी या वेळी व्यक्त केली. देशाचा इतिहास सातत्याने लोकांसमोर मांडण्याचे कामही साहित्यातून झाले आहे. आपल्या वैभवशाली देशाचे नाव भारत असल्याचे यातूनच समोर आले.

इंग्रजांनी आपल्या राजवटीत भारताचे नाव बदलत इंडिया केले. मात्र, आपल्या देशाचे वैभव अधिक उंचाविण्यासाठी भारत हेच नाव योग्य असल्याचे सांगत आगामी काळात इंडियाला हटवून इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतीक झटकून द्यावे, असे आवाहनही निलंगेकर यांनी केले. मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी जो संग्राम करण्यात आला होता त्याला मोठा इतिहास आहे.

शालेय अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करून मराठवाडा मुक्ती संग्रामच्या इतिहासाची ओळख आगामी पिढीला करून द्यावी, अशी मागणी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निलंगेकर यांनी केली. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष धनंजय गुडसुरकर, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव पाटील, तर विशेष अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रसिद्ध व्याख्याते सोमनाथ रोडे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी, नामदेव जगताप, कवी योगिराज माने आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT