Parbhani Politics : ऑपरेशन टायगर नाही, ही तर जनावारांची खरेदी विक्री असल्याचा हल्ला परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना लगावला. ते मनाने वर्षभरापासूनच तिकडे गेले होते. पण परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास एकदा नजरेखालून घाला, जे शिवसेना सोडून गेले त्यांची किंमत जिल्ह्याच्या राजकारणात शून्य झाली. यांचीही तीच गत होणार, असा इशाराच राहुल पाटील यांनी आॅपरेशन टागरवर प्रतिक्रिया देताना खासदार जाधव यांना दिला.
शिवसेना ही नेते, कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आहे. हा पक्ष नेते नाही तर कार्यकर्ते चालवातात, ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, आम्ही नव्याने पक्ष बळकट करू, असा विश्वास राहुल पाटील यांनी व्यक्त केला.
परभणी जिल्ह्याच्या राजकारणात एकाच पक्षात असूनही संजय जाधव आणि राहुल पाटील यांच्यात कधी जमले नाही. हे दोघे कायम एकमेकांच्या विरोधात भूमिका घ्यायचे. पक्ष फुटीनंतर दोघांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला याबाबत मात्र दोघांचे एकमत झाले होते.
परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत खासदार संजय जाधव यांनी नमते घेत राहुल पाटील यांना दोघांच्या मतभेद आणि वादात पक्षाचे नुकसान नको, अशी भूमिका घेत मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यानंतर हे दोघे बऱ्याच बैठका, कार्यक्रमात एकत्र दिसले. महापालिकेत मुस्लिम महापौर करण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हाही या दोघांमध्ये एकमत होते, असे बोलले जाते. मात्र काल नांदेडहून चार्टट प्लेनने संजय जाधव दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त धडकले.
गेल्या वर्षभरापासून खासदार संजय जाधव शिंदेसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर ती खरी ठरली आणि तीन टर्म खासदार, दोन वेळा आमदार राहिलेल्या जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाच. गेल्या दोन महिन्यात उद्धव ठाकरे यांनाही याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी परभणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोठे संघटनात्मक बदल केले होते.
आमदार राहुल पाटील यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संजय जाधव यांची रिप्लेसमेंट म्हणून 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल पाटील उमेदवार म्हणून दिसले तर नवल वाटायला नको, एवढे अधिकार त्यांना संघटना बांधणीसाठी जिल्ह्यात देण्यात आले आहेत.
खासदारांना पैशाच्या जोरावर फोडणे याला आपण ऑपरेशन टायगर मानत नाही. हे मनाने आधीच तिकडे गेले होते केवळ व्यवहार बाकी होता म्हणून थांबले होते. पक्षात दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदारकी दिलेली होती अजून उद्धव ठाकरे यांनी काय द्यायला पाहिजे होते? असा प्रश्नही राहुल पाटील यांनी उपस्थित केला. ते गेल्याने जिल्ह्यात शिवसेनेला नवी बळकटी येईल त्यांच्या रूपाने एक मोठा गतिरोधक पक्षातून दूर झाल्याचेही ते म्हणाले.
परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. हा जिल्हा गद्दारांना माफ करत नाही असा इतिहास आहे. यापूर्वी ज्यांना यांना शिवसेनेने मोठे केले त्यातले जे कृतघ्न निघाले, त्यांचे राजकारण संपले, यांचेही वेगळे काही होणार नाही,असा घणाघातही पाटील यांनी जाधवांवर केला.
परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने मशालीच्या चिन्हावर यांना निवडून आणले होते, आता हे पुन्हा त्याच चोरांच्या टोळीत सामील झाले आहेत, पण जनता या सर्व प्रकारचा हिशोब करील, असा इशाराही आमदार राहुल पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.