Minister Subhash Desai
Minister Subhash Desai Sarkarnama
मराठवाडा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासाची घोडदौड कायम राहणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे आणि कायमच सुरू राहणार आहे. (Aurangabad) कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी कौतुक केले.

त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरणयुक्त होईल, (shivsena) असा विश्वासही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला.

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संकटालाही खंबीरपणे सामोरे जाता आले.

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे. जिल्ह्याने कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरणयुक्त व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेतला. जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे १० लाखांच्यावर लसीकरण झाले. याकाळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. ४५ वर्षांवरील नागरिक, कोरोना योद्धे आदींसह ८१ टक्क्यांहून अधिकांनी पहिला,४५ टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. त्यात जिल्ह्यातील २७ पैकी 20 बालकांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित बालकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या ‘पोकरा’च्या अंमलबजावणीत सुरूवातीपासूनच औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. या प्रकल्पावर आजपर्यंत ४२४ कोटी ९० लाखांचा निधी ६९ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे.

कर्जवाटपात आघाडीवर

शिवभोजन शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. सर्व तालुक्यांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेला सुरूवात होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याचा आनंद होतो आहे. आजपर्यंत या योजनेचा जवळपास २२ लाख ३२ हजार गरीब, गरजूंनी लाभ घेतला आहे. खरीप, रब्बीसाठी एक हजार ६१६ कोटी रुपये कर्ज वाटपाचा लक्षांक दिलेला असताना जिल्ह्यातील दोन लाख १९ हजार २५५ शेतकऱ्यांना एक हजार २७२ कोटी रुपये एवढे कर्ज वाटप केलेले आहे. राज्यात कर्ज वाटपात जिल्हा आघाडीवर आहे.

जिल्ह्यातील दोन लाख ३६ हजार ९८४ शेतकऱ्यांना ९८२ कोटी रुपये रकमेचा महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाभही दिलेला असल्याचे देसाई म्हणाले. ऑरिक सिटी शेंद्रा येथे एसीजी युनिव्हर्सल कॅप्सूल या फार्मा कंपनीला २० एकर जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्या कंपनीची ६०० कोटीची गुंतवणूक आहे. ऑरीकमध्ये आजपर्यंत १२५ कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. तर पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व सहा हजारांची थेट रोजगानिर्मिती झालेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT