मुंबई : औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. तसेच औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणीही होत आहे. महाविकास आघाडी सरकारने तसा प्रस्ताव केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही दिला आहे. याबाबत शिंदे यांनी मुंबईत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Jyotiraditya Scindia Latest News)
शिंदे यांनी शनिवारी मुंबईत विविध मुद्दांवर माध्यमांशी संवाद साधला. आघाडी सरकारने औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. पण केंद्र सरकारवर त्यावर निर्णय घेत नसल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांना शिंदे यांनी उत्तर दिले.
मी शिंदे परिवाराचा मराठा माणूस
मी शिंदे परिवाराचा मराठा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे देशाचे, विश्वाचे नवरत्न आहेत, असं सांगून शिंदे म्हणाले, सरकारची एक कार्यप्रणाली आहे. हा केवळ एकमात्र प्रस्ताव नाही. देशातील अनेक विमानतळांचा प्रस्ताव आला आहे. त्यावर विचार, चर्चा करून मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल. निर्णय झाल्यानंतर तो ठाकरे सरकारलाही सांगितला जाईल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव नाही
नवी मुंबई विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. पण स्थानिकांचा त्याला विरोध आहे. स्थानिकांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
यावर बोलताना शिंदे म्हणाले, विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला राज्याकडून येतो. विधानसभेच्या प्रस्तावावर तो केंद्र सरकारकडे येतो. तो प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.