Health Minister Tanaji Sawant News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : धाराशिव रेल्वे पुनर्विकास कार्यक्रमातून मंत्री सावंत यांना कुणी डावलले ?

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल देशातील ५०८ तर राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. (Marathwada Political News) धाराशिव रेल्वेस्थानकात देखील याचा सोहळा उत्साहात पार पडला. खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बरेच नेते, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होते. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांची अनुपस्थीती मात्र सगळ्यांनाच खटकली.

सावंत (Tanaji Sawant) यांना कुणी डावलले? अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह (Ranajagjeet singh) यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांनीच सांवत यांना रेल्वे प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून डावलण्याची खेळी तर केली नाही ना? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. (Osmanabad) सावंत यांना डावलले गेल्याने शिंदे गटाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राजशिष्टाचार मोडण्याची हिंमत अधिकार्‍यांमध्ये असते का ? मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षीय पातळीवर सावंत यांच्यावरील राग काढण्याचा प्रयत्न केला गेल्याची शंका त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. (BJP) त्यांच्यावर कुणाचा राग आहे ? हे जिल्ह्यात वेगळ सांगायची आवश्यकता नाही. भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षानाही कार्यक्रमाला निमंत्रित केलेले नाही. माजी जिल्हाध्यक्षांसाठी मात्र व्यासपीठावर मानाचे पान होते. यातुन सगळेच आलबेल आहे अस अजिबात नाही.

जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी तीनच दिवसांपूर्वी प्रा. सावंत यांची भेट घेऊन पक्षांतर्गत कुरघोडी केल्याचा राग याप्रकारे काढल्याची चर्चा सुरू होताना दिसत आहे. एकाचवेळी दोघांनाही डावलणे हा निव्वळ योगायोग असु शकत नसल्याचे स्पष्ट आहे. मग या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? याचे उत्तर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांना उमगले आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कोनशिलेवर पालकमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख नसल्याने राजशिष्टाचाराचा भंग करणार्‍या रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी केली आहे. शिवाय त्याच कोनशिलेवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांची नावे असल्याचेदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

विशेष म्हणजे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचेही नाव कोनशिलेवर आहे. मग सावंत यांच्यावरच रेल्वे प्रशासनाची नाराजी का? रेल्वे प्रशासन कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार करत आहे का ? याचादेखील शोध घेतला जात आहे. सावंत यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्या गटाच्या जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सावध भूमिका घेत पक्षीय टीका करण्याचे टाळले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्याला डावलून हा कार्यक्रम आयोजित करून रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप सूरज साळुंके यांनी केला आहे. या प्रकरणातील जबाबदार रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांवरच राजशिष्टाचार भंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT