Asaduddin Owaisi on Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात मोठी घडामोड! प्रस्ताव आला तर चर्चा करणार, MIM च्या असदुद्दीन ओवैसी यांची जरांगे पाटलांना 'ऑफर'

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 14 July : 'एमआयएम' पक्षाचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. "जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाईन," असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकारणात नवीन समीकरण उदयाला येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यासह देशभरात जरांगे फॅक्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. जरांगे यांच्यामुळे महायुतीला चांगलाच फटका बसल्याचं या निकालातून दिसून आलं. त्यामुळे राज्यातील राजकारण जरांगे यांना डावलून करणं सोप्प नसल्याचं राजकीय नेत्यांना कळून चुकलं आहे.

शिवाय लोकसभेनंतर जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभेलाही आपला करिष्मा दाखवण्याचं जाहीर वक्तव्य केलं आहे. सरकारने मराठ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास सरकारला मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच ओवैसी यांनी जरांगेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या पराभवावर भाष्य करताना, मी मनोज जरांगे पाटील यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. कारण जरांगे पाटील यांच्यामुळे 8 खासदार निवडून आले, पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार का जिंकत नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी 'एमआयएम' कुठे निवडणूक लढवू शकतो, कुठे कोणता उमेदवार देता येईल याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले, मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली जात नाही, फक्त मत घेण्यापुरता त्यांचा वापर केला जातो.

लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवारांमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतांचा मोठा सहभाग आहे. 'एमआयएम'कडे वेगळ्या नजरेने पाहिले जातं. मात्र, आमच्याशी वेगवेगळ्या जातीचे लोक जोडले जात आहेत. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचं दुःख आहे. मुस्लिम सर्वांना मतदान करतात, मग बाकीचे आम्हाला का मतदान करत नाही? यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे," असं आवाहन त्यांनी मुस्लिमांना केलं.

जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला तर...

तसेच यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत मोठं विधान केलं. जर जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाईन असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं. याबाबत बोलताना ते म्हणाले, "बिडमध्ये (Beed) जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे, मग मुस्लिम का जिंकत नाहीत. महाराष्ट्रातील 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू," असं त्यांनी म्हटलं.

तसंच महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही, आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं. आम्ही सर्वांना मतं दिली पण आमचा उमेदवार पडला. आम्हाला बहुमत मिळाले, पण प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात, त्यांना वाटत आपला माणूस जिंकायला नको, अशा गद्दारांबद्दल निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी फुटीर नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT