maruti chitampalli.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maruti Chitampalli News: महाराष्ट्राचा 'अरण्यऋषी' हरपला! ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचं निधन

मारुती चितमपल्ली यांनी राज्य सरकारच्या वनविभागात 30 वर्ष नोकरी केली. या काळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते.

Deepak Kulkarni

Solapur News : ज्येष्ठ लेखक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचं सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (ता.18) निधन झालं आहे. गेल्या 30 एप्रिलला रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

वन्यजीव अभ्यासक, ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली (Maruti Chitampalli) यांचा जन्म सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात झाला होता. त्यांना सर्वत्र अरण्यऋषी म्हणून ओळखले जातात. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वत:ला वाहून घेतलं होतं.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. चितमपल्ली यांची वृद्धापकाळानं बुधवारी प्राणज्योत मालवली. या पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर ते दिल्लीहून सोलापूरला परतले,तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते गेले काही दिवस आजारी आणि अंथरुणालाच खिळून होते. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी मारुती चितमपल्ली यांचं निधन झालं.

मारुती चितमपल्ली यांनी राज्य सरकारच्या वनविभागात 30 वर्ष नोकरी केली. या काळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

ज्येष्ठ वन्यअभ्यासक मारुती चितमपल्ली यांचं शालेय शिक्षण सोलापूरच्या (Solapur) टी. एम. पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल तर माध्यमिक शिक्षण दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केले. चितमपल्ली यांनी त्यानंतरचं शिक्षण स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील संस्थामधून पूर्ण केलं. संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. विशेष बाब म्हणजे तब्बल 18 भाषांचं त्यांना ज्ञान होतं.

मारुती चितमपल्ली हे सोलापूरमध्ये झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते. त्यांनी वनविभागात नोकरी करताना निसर्गाशी आपुलकीचं नातं तयार केलं. त्यांनी या अनुभव व संशोधनावरुन पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं,  रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन यांसारखी मोठी ग्रंथसंपदा मराठी साहित्याला दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT