Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : ...ही लाचारी कशातून येते? सरकारला ठणकावत राज ठाकरेंनी दिला सणसणीत इशारा

Maharashtra Government Kalyan Incident MNS : कल्याणमधील एका मराठी व्यक्तीला परप्रांतियांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राजकारण तापले आहे.

Rajanand More

Mumbai : कल्याणधील मराठी व्यक्तीला मारहाणाची पडसाद शुक्रवारी विधीमंडळातही उमटले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त करत राज्य सरकारला ठणकावले आहे.  तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात?, असा सवाल त्यांनी केला आहे.

कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यांनी कल्याणधील घटनेबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी परप्रांतियांकडून मराठी लोकांना होत असलेल्या मारहाणीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.   

कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहत आहेत, असे ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.

'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ, असे खडेबोल राज ठाकरेंनी सरकारला सुनावले आहेत.

 मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरवावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी, असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT