Ajit Pawar, Raj Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar death : 'राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे..' भावनिक पोस्ट करत राज ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली..

Raj Thackeray On Ajit Pawar date : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार यांना एक्स पोस्टवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार गेले, माझ्याकडे शब्द नाहीत असं राज ठाकरे म्हणालेत.

Jagdish Pansare

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार गेले, माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला. अजित पवारांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. सत्ताधारी-विरोधक आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातही अजित पवारांच्या निधनाने अश्रू आहेत.

अजित पवार यांचे व्यक्तीमत्व सर्वांनाच भावणारे होते. अगदी विरोधकही अजित पवारांचा वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, कामाची धडाडी या गुणांचे कौतुक करताना थकत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणांमधून अजित पवारांच्या चांगल्या गुणांचे जाहीरपणे कौतुक केले होते. अजित पवारांच्या दुःखद निधनावर राज ठाकरे यांनी आपल्या भावना समाज माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

'माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली.

अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. 1990 च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.

अजित पवार जातीय नव्हते..

प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.

दिलदार विरोधक

अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.

राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे' असे राज ठाकरे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना राज ठाकरे यांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT