Mumbai Pune Expressway Sarkarnama
महाराष्ट्र

Pune Mumbai Expressway : पुणे- मुंबई प्रवास आता 'सुपरफास्ट'! 'गेम चेंजर' केबल स्टे ब्रिजमुळे वेळेची होणार मोठी बचत, 'हा' नवा पूल कुठे उभारला जातोय?

Mumbai Pune expressway missing link latest update मुंबई–पुणे प्रवास आता होणार सुपरफास्ट! गेम चेंजर केबल स्टे ब्रिजमुळे मोठी वेळ बचत. हा पूल नेमका कुठे उभारला जातोय ते जाणून घ्या.

Rashmi Mane

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास आणखी जलद आणि सुकर होणार आहे. दोन्ही शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील केबल स्टे ब्रिजचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. सह्याद्रीच्या कठीण पर्वतरांगेत उभारला जाणारा हा भव्य पूल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिल 2026 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आहे. ब्रिज सुरू झाला की मुंबई–पुणे प्रवास किमान 25 मिनिटांनी कमी होईल, ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

या प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जात आहेत. मिसिंग लिंक तयार झाल्यावर खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचे सध्या असणारे 19 किलोमीटरचे अंतर फक्त 13.3 किलोमीटरवर येईल. बोगदा साधारण 11 किलोमीटर लांब असून केबल स्टे ब्रिज मिळून उर्वरित अंतर साध्य होणार आहे. जवळपास 850 मीटर लांबीचे आणि 26 मीटर रुंदीचे हे दोन्ही केबल पूल दोन टप्प्यांत बनवले जात आहेत. बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुलाचे कामही वेगाने सुरू आहे.

या ब्रिजची उभारणी ही खूप आव्हानात्मक प्रक्रिया ठरली. सह्याद्रीच्या परिसरात जोरदार वारे, पावसाळ्यातील सततचे पावसाचे प्रमाण आणि धुक्याची दाटता यामुळे कामात अनेकदा अडथळे येत होते. वाऱ्याचा वेग कमी होण्याची किंवा धुके हटण्याची प्रतिक्षा अनेक वेळा करावी लागत होती. तरीही MSRDC च्या अभियंत्यांनी आणि कामगारांनी सातत्याने प्रयत्न करून प्रकल्पाला गती दिली आहे.

१८२ मीटर उंचीचा हा नवीन केबल स्टे ब्रिज वांद्रे–वरळी सी लिंकपेक्षा तब्बल 55 मीटर अधिक उंच आहे. सी लिंकचा मुख्य टॉवर 128 मीटर उंच आहे, तर या ब्रिजसाठी 182 मीटर उंच चार टॉवर क्रेनचा वापर करून काम केले गेले. उंची, वाऱ्याचा वेग आणि हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन याची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. या ब्रिजवरून 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने सुरक्षितपणे धावू शकतील, अशी रचना तयार केली गेली आहे.

हा पूल सुरू झाल्यावर वाहनधारकांना घाटातील वळणदार मार्ग टाळता येईल. त्यामुळे अंतर कमी होण्याबरोबरच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा मानस असून, तो सुरू झाल्यावर एक्सप्रेसवेवरील गर्दीतही मोठी घट दिसून येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT