Maharashtra News : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए चे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे आता देशाचे 17 वे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला. राधाकृष्णन यांच्या विजयानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत अचानक आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.त्याचमुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दक्षिण विरुद्ध दक्षिण अशी रंगतदार लढत पाहायला मिळाली. या लढतीत सी पी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी 452 मते घेत विजय मिळवला. तर रेड्डी यांना फक्त 300 मते पडली.
तामिळनाडूमधून 38 वर्षांनंतर उपराष्ट्रपती होणारे सीपी राधाकृष्णन हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्यानंतर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही जोडगोळी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील नवे राज्यपाल म्हणून कोणाला संधी देणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
मोदी-शाह या जोडीनं निवडणुकीची उमेदवारी असो किंवा भाजपची संघटनात्मक नियुक्ती यात नेहमीच धक्कातंत्र वापरल्याचं यापूर्वी दिसून आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या नवे राज्यपालांबाबतही मोदी-शाह पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करणार की काय हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं होतं. या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याच सगळ्यात राज्यपाल आणि राजभवन असे दोन्हीही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदु ठरले होते. तसेच कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकांवरूनही मोठं वादळ पेटलं होतं.
भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या राज्यपालांची फार अशी चर्चा झाली नाही.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महायुती सरकार सत्तेत परतले. त्यामुळे कोश्यारींनंतर आलेल्या रमेश बैस आणि सीपी राधाकृष्णन या दोन्ही राज्यपालांनी संयमी आणि महायुतीपूरक भूमिका घेत आपआपला कार्यकाळ पूर्ण केला.
आता महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि प्रचंड मोठं म्हणजे 237 संख्याबळाच बहुमत असलेल्या महायुती सरकारला पुढील चार वर्षे तरी कोणताही धोका दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांवर सध्यातरी काही मोठी जबाबदारी असण्याची शक्यता नाही.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी मोठा विजय मिळवला आहे. यामुळे ते लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार, याची चर्चा आहे. या स्थिर वातावरणात कोण राज्यपाल होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. मोदी-शाह यांच्याकडून परराज्यातूनच भाजप, आरएसएसचा एखादा नेता महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून येण्याची शक्यता अधिक आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत सीपी राधाकृष्णन हे राज्याच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते उपराष्ट्रपतीपदाची 12 सप्टेंबरला शपथ घेण्याची शक्यता आहे. यापदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांना राज्यपाल पद सोडावे लागणार आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा तात्पुरती कोणाकडे तरी सोपवली जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.