NCP Alliance: पुणे आणि पिंपरी-चिंचवड इथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असून ते एकत्रच निवडणूक लढवणार आहेत. मूळ राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत वाटेकरी होण पसंत केलं होतं. त्यामुळं पुन्हा शरद पवार अन् अजित पवार कुटुंब म्हणून एकत्र येऊ शकणार असतील तरी पक्ष म्हणून एकत्र येणार नाहीत, असं वाटत असतानाच त्यांची युती घडून आली आहे. पण या युतीसाठी नेमका पुढाकार कोणी घेतला? दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा प्रस्ताव पहिल्यांदा नेमका कोणी ठेवला? याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
सुप्रीया सुळे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल का? याचं उत्तर देताना म्हणाल्या, मी अशा चर्चा थांबवू शकत नाही पण यासाठी माझ्याकडून वेळ नाही, मी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्यस्त आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल की नाही? हा प्रश्न म्हणजे पाऊस पडेल की नाही? असा प्रश्न विचारण्यासारखं आहे. त्यामुळं मला खरंतर याचं उत्तर ठाऊक नाही. मी चर्चा करणारी व्यक्ती नाही मी वर्तमानात राहणारी व्यक्ती आहे.
तसंच दोन्ही राष्ट्रवादीची युती ही केवळ पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आहे की संपूर्ण राज्यात असणार आहे? यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मला याबाबत निश्चित माहिती नाही. पण आम्ही युतीबाबतचा डेटा गोळा करत आहोत संपूर्ण राज्यातून डेटा मिळाल्यानंतर आम्हाला योग्य माहिती मिळू शकेल. अजित पवार आपला फोन घेत नाहीत, असं सुळे एकदा म्हणाल्या होत्या. पण आता अजित पवारांशी फोनवर बोलणं होतं का? यावर बोलताना त्या म्हणाल्या, नक्कीच आम्ही सातत्यानं एक-दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. विशेषतः आमच्या जागा वाटपाबाबत.
१५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी खराब झाल्यास पक्षाच्या अस्तित्वाचं संकट ओढवू शकतं याची तुम्हाला भीती वाटते का? यावर सुळेंनी उत्तर दिलं की, राजकारणात भीती अशी कुठलीही गोष्ट नसते. तसंच तुमच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी का केली? यावर हा पक्षाचा निर्णय होता तसंच सर्वसंमतीनं हा निर्णय घेण्यात आला होता, असं सुळे म्हणाल्या.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्याची अर्थात युती घडवून आणण्याची कल्पना कोणाची होती आणि पहिल्यांदा कोणी कोणाला प्रस्ताव दिला? या प्रश्नावर सुप्रीया सुळे यांनी अगदीच राजकीय उत्तर दिलं. यामुळं काय फरक पडणार आहे? आपण केवळ फळं चाखली पाहिजेत झाडं मोजायची गरज नाही. मला या वादामध्ये पडायचं नाही, असं सुप्रीया सुळे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.