Mumbai News: महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना मोठं उधाण आलं होतं. बारामतीत याबाबतच्या जोरदार हालचालीही सुरू झाल्या होत्या. पण त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा विलिनीकरणाची जोरदार मागणी होत असतानाच सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकमतानं निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे सर्व घटनात्मक निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत. अशातच आता माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (ता.31) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबतचा मागचा सहा महिन्यांबाबतचा सगळा घटनाक्रम सांगतानाच अजितदादांबाबतही मनात इतकी वर्षे जपून ठेवलेली मोठा गोष्ट बोलून दाखवली आहे.
जयंत पाटील म्हणाले, अजितदादांच्या घटनेवरून नियती किती क्रूर असू शकते हे दिसून येतं, पण विमान हवेत असताना त्यातून मोठा आवाज येत होता असं तेथील एका सरपंचांनी मला सांगितलं होतं. विमानामध्ये काय प्रॉब्लेम होता, की नव्हता याबाबत ब्लॅक बॉक्समधून काही गोष्टी समोर येतील. पण अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर. आर. पाटील आणि माझ्यात कधीच एकमेकांशी स्पर्धा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, मी ज्या नेतृत्वासोबत चर्चा करत होतो तेच नेतृत्व आता नाही, आता ज्यांच्याकडे पक्षाचा निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी आता तो निर्णय घेऊन अजितदादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करावं, असंही पाटील यांनी म्हटलं.
जयंत पाटील म्हणाले,सुनेत्रा वहिनींचा आज शपथविधी होतोय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे; मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यानेच हा निर्णय होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निर्णय सध्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ सध्या घेताना दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी अजितदादांनी(Ajit Pawar) बाकीच्या नेत्यांना मी सांगितलं की, एकमताने निर्णय मान्य होतो असं त्यांचं मतही सांगितलं.
जयंत पाटील यांनी सांगितलं की, राजकारणामध्ये मर्यादा कशा सांभाळायच्या याचे उत्तम ज्ञान अजितदादांना होतं. ते कधीही माझ्यावर मर्यादा सोडून बोलले नाहीत ना, मी कधी त्यांच्यावर मर्यादा सोडून बोललो. पण अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते तर दादांनी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे काम केलं असतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजितदादांचं एकदा काम ठरलं की, त्याची अंमलबजावणी कशी करायची यात हातखंडा होता. त्यामुळे ते एक चांगले मुख्यमंत्री बनले असते. अजित पवार यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची सर्वांना बुद्धी देवो हेच मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझे आवाहन असणार आहे,असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं आहे. तसेच माझ्या पक्षात मी जे म्हणेल तेच ठरेल, एकही आमदार विरोधात जाणार नाही असा अजितदादांचा ठाम विश्वास होता, अशी भावनाही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.
जयंत पाटील म्हणाले, विशेष म्हणजे शरद पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सुरु होती आणि तारीख सुद्धा ठरली होती. शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती,तर शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो, पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नसल्याचा मोठा गौप्यस्फोटही यावेळी पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.