नागपूर : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारे अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागवून घेतला होता. त्यानंतर स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या मार्फत मुंडे यांनी राजीनामा पाठवून दिला. या राजीनाम्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी हा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असे मत व्यक्त केले.
यावर मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही आधीच मंत्रिपदाची शपथ द्यायला नको होती, पुढचा त्रास झाला नसता, असे म्हणत खंत व्यक्त केली. तसेच ‘देर आये दुरुस्त आये‘ अशीही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या आईची क्षमा मागितली. तसेच ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना कडक शासन करण्याची मागणीही केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्याचे मी स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनाम्यापेक्षा त्यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती. असे झाले असले तर पुढच्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले नसते. मी त्यांची लहान बहीण आहे. आम्ही एकाच आणि वेगवेगळ्या पक्षात काम केले आहे. आपल्या भावाला म्हणा किंवा परिवारातील सदस्यावर आरोप होत असतील दुःख होणे स्वाभाविक आहे. मात्र आपण ज्या महत्त्वाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा निर्णय घेताना प्रत्येकाचा विचार करावा लागतो.
संतोष देशमुख यांच्या परिवाराचे दुःख फार मोठे आहे. त्यांनी आपल्या कर्त्या माणसाला गमावले आहे. त्यांच्या दुःखापुढे धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मोठा नाही. मी जेव्हापासून शपथ घेतली त्यावेळीपासूनच या विषयावर अनेकदा व्यक्त झाली. आज मी मुंबईवरून नागपुरात विमानात असेपर्यंत मुंबईत काय सुरू आहे मला माहित नव्हते. मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पाहिली. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिल्याचे कळले. त्यांची बहीण असल्याने या विषयावर व्यक्त होणे अपेक्षित आहे. म्हणून मी बोलत आहे.
मी जे बोलणार आहे, त्यानंतर कुठल्याही प्रश्न- उत्तरासाठी जागा राहणार नाही. संतोष देशमुख यांच्या खुना संदर्भातील काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते व्हीडीओ बघायची माझी हिम्मत देखील झाली नाही. हा सर्व प्रकार अमानुष आणि तेवढाचा भयानक आहे. यामध्ये कोण आहे, कोणाचा हात आहे की केवळ हे तपास यंत्रणेला माहीत आहे. त्यात कुठलाही हस्तक्षेप करण्याचा कारण नाही.
हा जातीपातीचासुद्धा विषय नाही. गुन्हेगारांना कुठलीही जात नसते. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती फारच बदलली आहे. प्रत्येक गोष्ट जातीवर नेली जाते. त्यामुळे त्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला देखील जात नसली पाहिजे, असेही आवाहन पकंजा मुंडे यांनी केले. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करताना मी त्यांच्या आईची क्षमा मागते. ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना कडक शासन करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.