Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गैरव्यवस्थापनामुळे २१ बँकांना टाळे : शिक्षकांच्या उरल्या चारच बँका

सरकारनामा ब्युरो

अशोक निंबाळकर

Ahmednagar : समाजात गुरुजींची शिस्तप्रिय म्हणून ओळख आहे. काटकसर हा त्यांच्यातील एक महत्त्वाचा गुण. मात्र. त्यांच्या नेत्यांच्या गैरकारभारामुळे राज्यातील २१ बँकांना टाळे लागले. केवळ नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा मोजक्याच शिक्षक बँका उरल्या आहेत. त्यांत अहमदनगरची बँक सर्वांत आघाडीवर आहे.

आतापर्यंत बँकेवर आलेल्या प्रत्येक संचालक मंडळाने केलेल्या चांगल्या कारभारामुळेच हे फलित आहे. सध्या बँकेची निवडणूक सुरू आहे. सर्वच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गैरव्यवस्थापनावरून चिखलफेक करीत आहेत. सभेतील गोंधळामुळे राज्यात गुरुजींची मानहानीही झाली, हा भाग अलाहिदा. मात्र, सातत्याने शंभर टक्के वसूल आणि ऑडिट वर्ग ‘अ’मुळे बँकेच्या यशाची कमान चढती राहिली. त्याच बळावर १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केले.

राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या एकेकाळी २५ च्या पुढे बँका होत्या. परंतु त्या अवसायनात निघाल्याने टप्प्याटप्प्याने बंद पडल्या. त्यामुळे नगर, सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यात पतपेढ्या आहेत. त्या-त्या तालुक्यांतील शिक्षक त्याचे सभासद असतात. दुसऱ्या तालुक्यात बदलून गेल्यास किंवा परजिल्ह्यात गेल्यास त्याला सभासदत्व रद्द करावे लागते. तुलनेने कर्जही कमी मिळते. इतर सुविधाही अल्प प्रमाणात आहेत.

दुसरे विशेष म्हणजे नगरच्या सर्वच शिक्षक नेत्यांनी बँकेत राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्यांच्या राजकारणाला आतापर्यंत पक्षीय रूप आले नाही. इतर जिल्ह्यांत पतपेढ्यांच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा शिरकाव झाला. तिकीट वाटपावरूनही रणकंदन होते. परंतु नगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभाऱ्यांनी काही सत्त्व जपलेय.

१९१९ ला स्थापना

नगर जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथील प्राथमिक शिक्षकांची बँकही मागे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१९ रोजी वाळिंबे गुरुजी यांनी नगर शहरात शिक्षक पतसंस्थेची स्थापना केली. ही राज्यातील पहिली पतसंस्था होय. त्यानंतर लोकल बोर्डाचे शिक्षक त्यात सहभागी झाले. १९६९ रोजी लायसन्स मिळाल्याने पतसंस्थेचे रूपांतर बँकेत झाले. राज्यातील इतर जिल्ह्यांनी नगरचा आदर्श घेत बँका स्थापन केल्या. सुमारे २५ ठिकाणी बँका उभ्या राहिल्या. आता केवळ चारच उरल्यात.

- रा. या. औटी, शिक्षक नेते.

बँकेच्या सर्व चौदा तालुक्यांत शाखा आहेत. बाराशे कोटींच्या ठेवी आहेत. मयत सभासदांचे कर्ज माफ केले जाते. तसेच त्याला आर्थिक मदतही केली जाते. ३५ लाखांपर्यंत कर्ज मिळते. ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. या बँकेने लॉकर्सही उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षकांचा मूलभूत अधिकारी कायम शाबूत राहावा, या दृष्टीने कारभार केला. इतर बँकांमध्ये नगरचे नाव निघते, यातच सर्व आले.

- बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT