Solapur, 28 July : राज्यात अलनिनोचे संकट होते. मात्र, उजनी धरण भरले आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात (कॅचमेंट एरिया) पाऊस झाला आहे, त्यामुळे उजनी 97 टक्के भरले आहे. उजनी धरण आणि नदी परिसरातील वीज पुरवठा आता सुरळीत करण्यात येणार असून जवळपास 8 तास वीजपुरवठा केला जाणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा येत्या 2 ऑगस्ट रोजीपासून सुरू होणार आहे. तसेच, शहरात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी 94 टक्के जागा आता महापालिकेकडे हस्तांतर केली आहे. आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची 20 हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतर केली जाणार आहे. विशेष म्हणजे विनामोबदला ही जागा दिली जाणार आहे, त्यामुळे आयटी पार्कचा विषय मार्गी लागला आहे.
आषाढी वारीत आम्ही अनेक सुविधा आणि नावीन्यपूर्ण सुविधा दिल्या आहेत. स्वच्छतेला प्रचंड महत्व देत आपण ही स्वच्छता राखली आहे, त्यामुळे वारीत रोगाराई पसरणार नाही, याची काळजी घेतली. कोणतीही साथ दिसली नाही. वारीत 32 लाख वारकरी पंढरपूरमध्ये आले होते. प्रशासनाचे कौतुक आहे की, वारीची रांग 21 किमी होती. या लोकांना प्रशासनाने जेवण, पाणी, नाश्ता दिला, असेही गोरेंनी स्पष्ट केले.
धाराशिवमधील शिवसेना-भाजप वादावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आपला जीव धाराशिव हे व्हिजन घेऊन झेडपीने संकल्प केला आहे. ग्रामीण भागात ग्रंथालय यासह विविध सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कामाच्या उणीवा शोधाव्यात, राजकीय उणीवा शोधू नका. कार्यक्रमाला शिवसेना आणि इतर पक्षाचे नेतेही उपस्थित होते.
औषध निर्माण पेपरफुटी प्रकरणी ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे कोणताही पेपर फुटला नाही. पण, त्यांचे (रोहित पवार) MPSC चे पेपर वेगळे असावेत. आम्ही एनडीए म्हणून एकसंघ आहेत. आणखी काही लोकं एनडीएमध्ये येत आहेत. आपणच त्या बातम्या चालवत आहात.