Dhanyakumar Jadhav, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon News : सावकाराकडून छळ; शेतकऱ्याने पत्रातून मुख्यमंत्र्याकडे केली धक्कादायक मागणी?

Umesh Bambare-Patil

Koregaon News : दुधनवाडी (ता. कोरेगाव) येथील धन्यकुमार जाधव या शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असे मागणी करणारे पत्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कक्षात दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार बनवडी सोसायटी सचिव, काही सावकार सतत वसुलीचा तगादा लावत असून आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने आमच्या संपूर्ण कुटुंबास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मराठवाडा, विदर्भात होत असतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात Satara District एखादा अपवाद वळगता इथला शेतकरी मनाने खंबीर आहे.परंतु नुकता एक अर्ज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यमंत्री कक्षाकडे आलेला आहे. तो अर्ज बनवडी येथील शेतकरी धन्यकुमार जाधव यांनी केलेला आहे.

त्यांनी केलेल्या अर्जात म्हटले आहे की, मी या देशाचा नागरीक आहे. विनंतीपूर्वक कळवून मी आत्महत्या करण्यास परवानगी मागत आहे.आज देशातील गरीब शेतकऱ्यांना जगणे मुश्किल बनले आहे. तेरा- तेरा तास राबणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.गरीब शेतकऱ्यांच्या जमीनी काढून घेण्याचे काम होत आहे.

गरीब शेतकऱ्यांच्या जमीनीवर धनदांडगे,सावकारांचा डोळा असतो.त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना वसुलीच्या,जप्तीच्या नोटीसा पाठवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम केले जात आहे.माझी अल्प मुरमाड डोंगरी भागात शेती आहे.त्यातून चांगले उत्पन्न मिळत नाही गायीम्हैशी पाळून रात्रदिवस राबतो. दुधाला दर नाही, ऊसाला भाव नाही.

येणाऱ्या पैशातून सोसायटी भागत नाही. बँक भागत नाही. पतसंस्थेचे कर्ज फिटत नाही. कुटुंबाकरता एक रुपया शिल्लक राहात नाहीत. त्याता शासनाने वन्यप्राणी संरक्षण कायदा केलेला आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. शेतीचे नुकसान करत असून त्याची भरपाई मिळत नाही. शासन आमदार, खासदार, सर्व शासकीय नोकरदार यांचे पगार वाढवत राहते. त्यांना भत्ते, सुविधा मिळतात.

अलिशान सदनिका मिळतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणती सुविधा नाही. आहे त्या सुविधा फक्त कागदावरच. शासन आपल्या दारी, योजनाची जत्रा शासनाने राबवलेली आहे त्याबद्दल शासनाचे धन्यवाद. पण, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत योजना येत नाहीत. मला शासनाच्या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही.

मी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. कोरेगाव तालुक्यातील बनवडी सोसायटी सचिव वसुलीसाठी खूप तगादा लावून त्रास देत आहेत. काही सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. मला व माझ्या कुटुंबीयांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

edited by : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT