Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vitthal Sugar Factory : विधानसभेच्या तोंडावर अभिजीत पाटलांना ‘बूस्टर डोस’; 'विठ्ठल'ला 267 कोटींचे अर्थसाहाय्य

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 August : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 107. 69 कोटी रुपये राखून ठेवल्यानंतर उर्वरित 487.07 कोटी रुपये राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 267. 59 कोटी रुपये कर्ज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर झाले आहेत.

त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी हा मोठा बोनस मानला जात आहे.

राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (NCDC) राज्यातील सोळा साखर कारखान्यांना (Sugar Factory) मर्जिन लोन उपलब्ध करून देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे, त्यातील पाच कारखान्यांसाठी 594.76 कोटी रुपये इतका निधी राज्य सरकारला उपलब्ध करून दिला आहे. तो निधी राज्यातील पाच सहकारी कारखान्यांना मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या 23 जुलै रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मर्जिन लोन संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने 107. 69 कोटी रुपये 19 सप्टेंबरपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ही रक्कम राखीव ठेवून उर्वरित 487.07 कोटी रुपयांची रक्कम राज्यातील पाच साखर कारखान्यांना वितरित करण्यात आली आहे.

पाच साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक 267 कोटी 69 लाखांचे कर्ज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्यात आली आहे, त्यातील प्रत्यक्ष 219.54 कोटी रुपयांची रक्कम विठ्ठल कारखान्याला मिळणार आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील पद्मविभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर कारखान्याला 148.90 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला 90.30 कोटी रुपयाचे रक्कम मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याला 65 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे, तर आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी तालुका औसा येथील शेतकरी सहकारी कारखान्याला 22.97 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे.

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी विठ्ठल कारखान्याला मदत करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार विठ्ठल कारखान्याला सर्वाधिक 267 कोटी 69 लाखांचे कर्ज मिळाले.

माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा अभिजीत पाटील यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल कारखान्याला मिळालेले हे कर्ज अभिजीत पाटील यांना बोनस ठरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT