पश्चिम महाराष्ट्र

लांडेवाडीची बैलगाडा शर्यत आमच्या विरोधी नेत्यांच्या डोळ्यात खुपली : आढळरावांचा रोख कुणाकडे

सरकारनामा ब्यूरो

पुणे : इतिहासातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत (Bullock cart race) लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, बंदी उठविल्यानंतरची पहिली शर्यत ही लांडेवाडीत म्हणजे शिवसेनेच्या माजी खासदारांच्या (आढळराव पाटील) गावात भरते, हे काही लोकांच्या डोळ्यात खुपलं. त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेअकरा वाजता आम्हाला अगोदर दिलेली परवानगी मागे घेतली. ह्याला कारणीभूत पुणे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील आमचे विरोधी नेते आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) यांनी केला. (Adhalrao patil says, Bad experience of Mahavikas Aghadi in last two years)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. २ जानेवारी) मतदान झाले. शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी वरील आरोप केला.

ते म्हणाले की, माझ्या गावात भरविण्यात आलेली बैलगाडा शर्यत काहींच्या डोळ्यात खुपली. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेअकरा वाजता आम्हाला अगोदर दिलेली परवानगी मागे घेतली. त्याच्या पाठीमागे नक्कीच संशयास्पद भूमिका आहे, हे सर्व बैलगाडा मालकांना माहिती आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेले जवळपास दोनशे व्यापारी शनिवारी (ता. १ जानेवारी) दिवसभर ढसाढसा रडत होते. कारण त्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. ह्याला कारणीभूत जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील आमचे विरोधी नेते आहेत.

महाविकास आघाडीचा गेल्या दोन ते अडीच वर्षांत मला खूप वाईट अनुभव आलेला आहे. खेड पंचायत समितीचे सभापती यांना थोडीशी बाचाबाची आणि शुल्लक कारणांमुळे काही लोकांच्या, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे सहा महिने जेल राहावे लागले. सहा महिन्यांनंतरही अजूनही आमचे काही लोकं बाहेर यायचे आहेत. आमच्यावर अन्याय झाला आणि आमच्याच लोकांना जेलमध्ये टाकलं, याचं कारण संपूर्ण राज्याला माहिती आहे,असेही आढळराव यांनी सांगितले.

मी आजच सकाळी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोललो. आमची माफक मागणी एवढीच आहे की, शिवसैनिकांना पुणे जिल्ह्यात सुखाने आणि शिवसैनिक म्हणून जगू द्या. आमची दुसरी कोणतीही मागणी नाही. शिवसेनेला संपवायचा डाव चालू आहे. पण आमच्या नादी लागू नका, असा इशारा देऊन माजी खासदार आढळराव म्हणाले की, महाविकास आघाडी आम्हाला मान्य आहे. पण, आमचे अस्तित्व तरीही राहू द्या. आम्हाला मारू नका. आम्ही कोणाची छेड काढत नाही, कुणाची नादी लागत नाही. पण आम्हाला संपवू नका; आम्हाला जगू द्या, एवढीच माझी विनंती आहे.

महाआघाडीतील घटक पक्षाकडून होणार त्रास मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या कानावर वेळोवेळी घातला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या आमच्या सदस्यांनी वेळोवेळी त्यांच्या पक्षनेतृत्वाच्याही कानावर या सर्व गोष्टी घातल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT