Shivsena Leader Aditya Thackeray Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aditya Thackeray News : 'भाजप जिंकणार नाही, मात्र चुकून जिंकली तर ...' आदित्य ठाकरेंचं कोल्हापूरात मोठं विधान!

Rahul Gadkar

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीचे सात पैकी दोन टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बहुतांश ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले आहेत, तर अद्यापही काही ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीमध्ये आगामी टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहचला आहे. या प्रचारसभांमधून राजकीय नेते विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनाही कोल्हापूरातील जाहीर सभेत बोलताना भाजपा आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कितीही ठाण मांडलं तरी हा जिल्हा महाविकास आघाडी सोबत राहणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहे देशात इंडिया आघाडी पुढे आहे. भाजप जिंकणार नाही मात्र चुकून जिंकली तर पहिलं टार्गेट त्याचं संविधान आहे. भाजपाला संविधान बदलायचा आहे. भाजपला लोकशाही संपवून टाकायची आहे. ते आम्ही होऊ देणार नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'महाराजांच्या विरोधात इथं प्रचार करणं हा भाजपाचा महाराष्ट्रद्वेष देशासमोर आला आहे. पहिला गुजरात मधील कांदा निर्यात बंदी हटवली . त्यामुळं सगळं काही गुजरातसाठी चाललं आहे, यात महाराष्ट्र कुठे आहे ? नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या कोल्हापुरातील सभेनंतर महाविकास आघाडीची मतं दुप्पट होतील.' अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

याशिवाय 'जे गद्दार गुजरातला पळून जाऊन टेबलवर नाचतात ते माझ्या आजोबांचं नाव घेऊ शकत नाहीत. मी गद्दाराच्याकडे जास्त लक्ष देत नाही. जे शिवसेना सोडून पळाले ते रडून पळाले स्वतःला वाचवण्यासाठी ते पळाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याच्या ते लायकीचे नाहीत. संजय राऊत आज एक मोठा लढा लढत आहेत ते स्वतः जेलमध्ये गेले या गद्दारांच्या सारखं त्यांनी केलं नाही. आज देखील संजय राऊत उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठावंत म्हणून राहिले आहेत.' असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

'उद्योगपतींना दिल्लीतून फोन येतात हे खर आहे, अजित दादा(Ajit Pawar) काय म्हणाले हे मला माहिती नाही. दिल्लीतून फोन आल्यानंतर सर्व उद्योगपतींना दबावाने गुजरातला जावं लागलं हे खर आहे. या खोके सरकारच्या काळामध्ये राज्यात एक तरी नवा उद्योग आला आहे का? देणंघेणं वाटाघाटी आणि खोके यामध्येच हे सरकार व्यस्त आहे. पुरात बाळासाहेबांना सोडून फाईव्हस्टार मध्ये गेल्याच्या अफवा आहेत त्या अफवाच राहतील त्याकडे लक्ष देऊ नका.' असं आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT