Pune News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा बुधवार (ता.28) सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजूनही अनेकांचा या घटनेवर विश्वासच बसत नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांबाबत नुकतेच एकत्र घालवलेले क्षण, आठवणी सांगितल्या आहेत.
राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी अजित पवार यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास अनौपचारिक चर्चा झाली. त्यामध्ये हास्यविनोद झाले, सांगलीतील महापौरपदाबाबतच्या चर्चा झाल्या. त्याबाबतच्या आठवणी आज चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत एकत्रित कॅबिनेट बैठकीला उपस्थित होतो. त्यानंतर अर्धा तास त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह चर्चा झाली. त्यामध्ये सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीची चर्चा आम्ही एकत्रित केली. त्यावेळी झालेल्या हास्यविनोद हा भास आहे की काही असं वाटायला लागला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे शोकसंदेशांमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, "अजितदादा... तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच... अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती.
एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला. त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं.
पण अजितदादा फक्त राजकारणी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही जवळून पाहता आले. कठोर, कठीण निर्णय घेताना ते कधी डगमगले नाहीत. प्रशासनातील अधिकारी असो वा पक्षाचा कार्यकर्ता, चुकीचं वागण्या-बोलणाऱ्याला त्यांनी नेहमीच खडेबोल सुनावले. पण व्यक्ती, राजकारणी म्हणून प्रसंगी कटू बोलणाऱ्या अजितदादांचा स्वभावाला आणखी एक किनारही होती. मिश्कीलपणाची. प्रसंगी एखाद्याला चार शब्द सुनावताना अजितदादा पटकन असं काही तरी बोलायचे की, त्यांची बोलणी खाणाराही नकळत हसायचा.
अजितदादांचा आणखी एक पैलूही नेहमीच लक्षात राहील. त्यांचं बारामती, जन्म-कर्मभूमीवरचं प्रेम. अगदी तरुण वयातच त्यांनी जिथून सामाजिक-राजकीय कारकीर्द सुरू केली, ती बारामती त्यांच्यासाठी नेहमीच खास होती. राजकारणातली एक-एक पायरी चढून वर येताना अजित पवारांचे अजितदादा झाले. त्यांनी स्वतःची, स्वतंत्र ओळख निर्माण केली ती, सामाजिक-राजकीय कार्यातून. तीच त्यांची खरी ताकदही होती. अजितदादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःची बलस्थानं नेमकी ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी नेहमी महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं.
बारामती, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीच ते नेहमी झपाटून काम करत राहिले. एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं.आज अजितदादा आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाहीये. अजितदादा, (Ajit Pawar) तुमचा राजकीय प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील." असा शोकसंदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.