पुण्यातील प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला अनुकूल असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी प्रभाग तोडणीच्या आरोपांसह भाजपवर टीका केली आहे.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या आरोपांचे खंडन केले आहे.
Pune News : प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही नेत्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी देखील करण्यात आलेली प्रभाग रचना ही भाजपला अनुकूल असून कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रभाग तोडण्याचे काम या प्रभाग रचनेच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या सगळ्या आरोपांची हवाच काढून टाकली असल्याचं बोललं जात आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी प्रभाग रचनेवरती भाष्य केले. अजित पवार म्हणाले, संपूर्ण राज्यभरामध्ये प्रभाग रचनेचे काम सुरू असून प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना होत नसते. रचनेत मायनस आणि प्लस 10 टक्के इकडे-तिकडे होत असतं, असं माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे. कारण मी देखील 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत आहे. आपलं लोकांशी वागणं बोलणं चांगलं असेल तसंच आपण लोकांचं काम केलं तर प्रभाग रचना कशी ही असली तरी जो लोकांची कामं करतो, त्याला याचा फारसा फरक पडत नसतो. मुळातच प्रत्येकाला हवी तशी रचना होत नाही. फार मोठ्या प्रमाणात काहीतरी वेगळाच बदल प्रभाग रेषेने झाला असेल तर हरकती सूचना दिल्यानंतर तो बदल केला जातो अजित पवार म्हणाले.
विरोधकांकडून होत असलेल्या मत चोरीच्या टीकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहे. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मतचोरीचे मुद्दे समोर आणले जातात, यात काहीही तथ्य नाही.
एशिया कप मध्ये भारत पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. यावरून विरोधकांकडून टीका होत आहेत. त्यावरती बोलताना अजित पवार म्हणाले, भारत आणि पाकिस्तान मॅचवर कोण टीका करत, तर सकाळी भोंगा वाजवणारी व्यक्ती. तुम्ही पण कोणत्या गोष्टीला प्रसिद्धी देता. आता काहीचं म्हणणे की भारत-पाकिस्तान मॅच व्हावी, खेळात कोणतंही राजकारण आणू नये. तर कोण म्हणतं, की पाकिस्तान कुरघोड्या करत, अनेकदा हल्ले करत. त्यामुळं त्यांच्याशी कोणतेच संबंध ठेऊ नयेत. असं म्हणणारा ही एक वर्ग आहे. असे प्रसंग येतात, तेंव्हा दोन बाजू असतात. कोणत्या बाजूने तुम्ही विचार करता, यात उत्तर दडलेलं असतं
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत विचारला असता अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, वातावरण शांत राहावं असं प्रत्येक सरकारला वाटत असते. पण समोरचा व्यक्ती कसा प्रतिसाद देतो, त्यावर हे अवलंबून असते. मात्र प्रत्येकाची काळजी घेणं हे सरकारच काम असतं. सरकार म्हणून आम्ही मोर्चाबद्दल चर्चा केलेली आहे.
बाळासाहेब थोरात आणि कीर्तनकार वादावरती बोलताना अजित पवार म्हणाले, मी अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. ज्याने त्याने प्रत्येक क्षेत्राला मान-सन्मान द्यायला हवा. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, प्रत्येकानं असं वागलं तर वाद-विवाद होणार नाही.
प्रश्न 1: प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप कोणाने घेतले?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि काही नेत्यांनी.
प्रश्न 2: नेत्यांचा आरोप काय आहे?
उत्तर: प्रभाग रचना भाजपला अनुकूल असून राष्ट्रवादीच्या प्रभागांचे तोडकाम केले असल्याचा आरोप करण्यात आला.
प्रश्न 3: अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या आरोपांची हवा काढून टाकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.