Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; कर्नाटकच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बळीराजाचे प्रश्न सोडवा...

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राचे असून १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे दुसऱ्या राज्याचा प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यांत बळीराजा किती पीडित अवस्थेत आहे, याचे गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असा टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना लगावला. महाविकास आघाडी मजबूत असून जागा वाटपाच्या संदर्भात चर्चेची पहिली फेरी झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बॅंकेतील कार्यकमानंतर अजित पवार यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असून हे पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जावे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ही निवडणुकीतील विधाने असून ती फारसे गांभीर्याने घ्यायची नसतात. आपल्या सरकारला धोका आहे, असे कोणी कसे म्हणेल.

राज्य सरकारचा प्रशासनावर प्रचंड दबाव असून ३१ मार्चअखेर ठेकेदारांची बिले सुद्धा अद्याप मिळालेली नाहीत. राज्याची आर्थिक अवस्था बिकट असून कायदा सुव्यवस्था गंभीर झाली आहे. जिल्ह्यातही तशीच अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बांधावर जाऊन बळीराजाचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवले पाहिजेत.

जर निधी उपलब्ध नसेल तर वित्त विभागात बसून चर्चा करून सोडवायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उन्हाळी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी सुद्धा आहेत.

त्यामुळे दुसऱ्या राज्याचा प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यांत बळीराजा किती पीडित अवस्थेत आहे, याचे गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. प्रचारा पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विकास कामांची जत्रा हा भाजपचा प्रचार फंडा आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, या योजनेत पक्षाचा प्रचार कसा होईल हे पाहिले गेले आहे. सामान्य जनतेला काय वाटते हे जाणून घ्या.

कर्नाटक निवडणुकीविषयी ते म्हणाले, तेथे काय निकाल लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही. तेथे धार्मिक ध्रुवीकरण करून भावनिक मुद्दा करुन तेथील राजकारण वेगळ्या मार्गाने नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संविधानाची बुज राखून आपण सर्वांनी पुढे जायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. महाविकास आघाडी मतभेदाविषयी विचारले असता ते म्हणाले, असे अजिबात नाही, एखाद्या वृत्तपत्रात छापून येते ते त्यांच्या संपादकांचे मत असते.

महाविकास आघाडी मजबूत

आमची महाविकास आघाडी मजबूत असून जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ खडसे, जयंत पाटील अशी चर्चेची एक फेरी झाली आहे. घटक पक्ष काँग्रेस हा सुद्धा आमच्यासोबत आहे. त्यांच्या संदर्भात अद्याप चर्चा नाही. पुढील काळात या सुद्धा वाटाघाटी केल्या जातील. मात्र, कोणत्याही राजकीय स्थित्यंतराचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT