Rahul Gandhi, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Congress News : कॉंग्रेस वर्किंग कमिटीतही डावलले; पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीतील वजन घटलं?

Umesh Bambare-Patil

Satara Congress News : एकेकाळी काँग्रेसमध्ये दिल्लीतील वर्तुळात पृथ्वीराज चव्हाण यांचा दबदबा होता. राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही निर्णयात पृथ्वीराज चव्हाण यांच मत महत्वाचं मानलं जायचं, मात्र गेल्या काही वर्षात विशेषतः जी 23 नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीतील काँग्रेसच्या वर्तुळातील दबदबा कमी झाला आहे. विधानसभा सभापती, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि आता काँग्रेस वर्किंग कमिटीत स्थान न मिळाल्याने काँग्रेस श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याचं स्पष्ट झाले आहे.

कॉंग्रेस Congress सत्तेत असताना दिल्लीत काँग्रेसच्या मोजक्या वजनदार नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांचे नाव घेतलं जायचं. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्याचबरोबर गांधी घराण्याचे किचन कॅबिनेट म्हणून त्यांच्याकडे बघितल जायचं. लोकसभा सदस्य, लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्यसभा सदस्य आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपदासारखं अशी पद त्यांना देण्यात आली. राज्याच्या राजकारणात सक्रिय नसतानाही मुख्यमंत्रीपदही देण्यात आले.

अवघ्या साडे तीन वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांची प्रतिमा आणखीच उजळली. भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक प्रसंगी स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी आणि मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची गय केली नाही. काँग्रेस आघाडीची भ्रष्टाचारी अशी इमेजही पुसून काढण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला.

मात्र, या सगळ्याचा फायदा निवडणुकीत झाला नाही. 2014 ला सत्तांतर झाले. त्यानंतर सातत्याने पृथ्वीराज चव्हाण भाजप आणि त्यांच्या धोरणावर टीका करत आले आहेत. भाजपच्या विरोधात अत्यंत प्रभावीपणे ते मुद्दे मांडताहेत. मात्र, भाजपपुढं निष्प्रभ ठरलेल्या कॉंग्रेसची वाताहत थांबवण्यासाठी राहुल गांधी प्रभावी ठरत नाहीत. पक्ष वाढीसाठी गांधी कुटुंब सोडून अध्यक्ष करावा, अशी मागणी होऊ लागली.

ही मागणी कॉंग्रेसचाच 23 प्रमुख नेत्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत थेट पोहचवली. विशेष म्हणजे या 23 जणांमध्ये गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज चव्हाण होते. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मात्र, जी 23 नंतर कॉंग्रेस नेतृत्वाने अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरचे असलेले मल्लिकार्जुन खरगे यांना केले. पण जी 23 मधले नेते असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना लांब ठेवल्याचे स्पष्ट आहे.

यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यात कॉंग्रेसच्या वाट्याला आलेलं प्रमुख मंत्रीपद बाळासाहेब थोरात यांना दिले तर विधानसभा अध्यक्षपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र तेही मिळाल नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा प्रभावी नेता प्रदेशाध्यक्षपदी असावा अशी मागणी होती. मात्र तेही नाना पटोले यांना देण्यात आले.

विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारला जेरीस आणण्याची क्षमता श्री. चव्हाण यांच्यात होती. तिथंही अन्याय झाला. आता भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असलेल्या अशोक चव्हाण यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत संधी देण्यात आली आणि पृथ्वीराज चव्हाण यांना डावलण्यात आले. या सगळ्या घटना बघता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील पक्षश्रेष्ठीची नाराजी कमी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT