sanjay mama shinde | narayan patil | amol kolhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe : "खिशात पैसा जास्त झाल्यानं जनता 'मामा' बनत नाही," खासदार कोल्हेंनी संजय शिंदेंना डिवचलं; म्हणाले, "आबांशिवाय..."

Akshay Sabale

खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता मामा बनत नाही. आबांशिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय जमत नाही, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर निशाणा साधत एकप्रकारे नारायण आबा पाटील करमाळ्यातून 'तुतारी'कडून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे करमाळ्यात पुन्हा एकदा संजयमामा शिंदे विरुद्ध नारायण आबा पाटील, अशी लढत पाहायला मिळणार आहे.

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ( शरदचंद्र पवार ) शिवस्वराज्य यात्रा करमाळ्यात पोहोचली होती. यावेळी खासदार कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी तुफान बॅटींग करत उपुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संजयमामा शिंदे आणि महायुती सरकारला लक्ष्य केलं.

अमोल कोल्हे म्हणाले, "2014 मध्ये नारायण आबा पाटील ( Narayan Patil ) यांच्या प्रचाराला येण्याचा योग लाभला होता. यानंतर परिस्थिती बदलली. आता पुन्हा आबांच्या प्रचाराला यावं लागेल. जनतेमधील उत्साह पाहून 'करंट' बरोबर असल्याचं दिसत आहे. फक्त समोरच्याला 'झटका' दिल्याशिवाय जनता काय गप्प बसत नाही."

"महाराष्ट्रातील महायुतीचं भ्रष्ट, ट्रिपल इंजिन खोके सरकारला चलेजाव म्हणायचं आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला क्रांती दिनादिवशी 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली. ती महायुती सरकारला चलेजाव म्हणण्यासाठी... आपले दिवस भरले आहेत, हे सरकारला कळून चुकलं आहे. त्यामुळे कोणतीही योजना लागू करा आणि सरकार वाचवा, अशी गत महायुतीची झाली आहे," असा हल्लाबोल खासदार कोल्हेंनी केला आहे.

"राज्यातील प्रत्येक जनतेच्या डोक्यावर 65 हजार रूपयांचं कर्ज आहे. महाराष्ट्रावर साडेसात लाख कोटी रूपयांचा बोजा आहे. असं असताना सरकार रोज एक नवीन योजना आणण्याचा प्रयत्न करत आहे," अशी टीका खासदार कोल्हेंनी केली.

'सुप्रिया ताईंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करण्याची चूक झाली,' असं विधान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं. यावरून कोल्हेंनी कवितेच्या माध्यमातून अजितदादांवर हल्लाबोल केला. "कुणीतरी म्हणालं, असं नको व्हायला होते... पक्ष आणि चिन्ह चोरताना हे मन कुठे गेले होते... साहेबांच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होतं... मग अचानक कसं काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको... पराभव दिसला, जनतेनं झिडगारलं की गुलाबी जॅकेट तोकडं पडलं म्हणून म्हणावसं वाटलं, माझं चुकलं... पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, अशा चुकीला माफी नाही. महाराष्ट्राच्या जनमानसात गद्दारीला जागा नाही," असे फटकारे अमोल कोल्हेंनी लगावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT