ajit pawar ramraje nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan NCP News : फलटणच्या राजे गटाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करावी; कोणी केली मागणी?

Umesh Bambare-Patil

Satara News, 29 May : माढा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Constituency ) सध्या राजे गटाच्या भूमिकेवरुन वादंग उठले आहे. लोकसभा निवडणुकीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी, अशी फलटणच्या राजे गटाची मागणी होती. पण, ही मागणी डावलून भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या राजेगटाने या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे काम केले. आता पक्ष विरोधी काम केल्याबद्दल त्यांची चौकशी करुन त्यांची राष्ट्रवादीतून ( अजित पवार गट ) हकालपट्टी करावी, अशी मागणी फलटण पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार या मागणीकडे, कसं पाहणार याची उत्सुकता सध्या फलटण तालुक्यात रंगली आहे.

अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे आहे. तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मात्र, माढा लोकसभेच्या निवडणुकीत शांत राहून गणिते फिरवली. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट मिळू नये, म्हणून रामराजेंनी पहिल्यापासून प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी थेट दिल्ली गाठून तिकीट फायनल करुन आणले. त्यामुळे राजे गटाने वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार गट हा महायुतीत असल्याने त्यांना महायुतीचा धर्म पाळणे, तसेच पक्षाचे काम करणे बंधनकारक होते. मात्र, राजे गटाने खासदार शरद पवार यांच्या उमेदवाराचे काम केले आहे. यावरुन फलटण पालिकेतील गट नेते अशोकराव जाधव यांनी राजे गटावर तोफ डागली आहे. राजे गटाची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

अशोकराव जाधव म्हणाले, "माढा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता फलटणमधील राजे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे राजे गटावर पक्ष विरोधी काम केल्याबद्दल पक्षपातळीवर चौकशी करुन त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करावी."

"नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमूख नेतृत्वास साथ देत सत्तेत सहभागी होऊन फायदा घ्यायचा व युती धर्माचे पालन करायचे नाही. हा मिठाचा खडा राजे गटाने महायुतीत टाकला आहे. रामराजे आणि त्यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत विरोधात केलेल्या कामाची चौकशी करावी. तसेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी," असं अशोकराव जाधव यांनी म्हटलं.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT